🕒 1 min read
मुंबई : राज्यामध्ये शिंदे-फडणवीस असं नवं सरकार स्थापन झालं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल मुंबईत आणि ठाण्यात भाजपकडून त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो नाही. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी या विषयावर भाष्य करणं टाळलं. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलं.
संजय राऊत यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावलाय. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणायला मला कठीण जात आहे असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांना चिमटा काढलाय. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक देखील केले.
“देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीवर काय सांगाल?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, “यावर मी कसं काय बोलणार? भाजपाने निर्णय घेतलाय त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा. मला अजून फडणवीसांबद्दल बोलताना तोंडामध्ये उपमुख्यमंत्री हा शब्द येत नाही. एक तर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण त्यांना बोलत आलोय. ‘उप’ हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जातंय. देवेंद्रजींच्या बाबतीत असं काही झालं किंवा होत असेल तर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे,” असं राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देऊन ब्राह्मण समाजाला खाली खेचण्याच काम भाजप करत आहे असा आरोप ब्राह्मण महासंघाने केला होता. या संदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देणं हा पंख छाटण्याचा प्रयत्न वाटतो का? असे विचारल्यावर राऊत म्हणाले, “मी असं नाही म्हणणार. शेवटी कोणाला आनंद वाटेल का? जे मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत बसलेत. नवीन सरकार स्थापन होतंय. विधीमंडळ पक्षाची बैठक होतेय आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद स्वीकारा असा आदेश दिला जातो. आता जे मुख्यमंत्री झालेत ते त्यांच्याच मंत्रीमंडळामध्ये ज्युनियर मंत्री होते. भाजपामध्ये शिस्त आणि आदेश याचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागले. त्याचं कौतुक केलं पाहिजे,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
