नंदुरबार – देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या 12,01,009 वर पोहोचली असून देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ही संख्या 8.88% आहे. सक्रिय रुग्णसंख्येत गेल्या 24 तासात 92,922 रुग्णांची नोंद झाली.भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यात 70.16% रुग्ण आहेत.
देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 47.22% रुग्ण आहेत.राज्यातील शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनासंसर्ग मागील काही दिवसांपासून झपाट्याचे वाढताना दिसून येत आहे.काल ५१ हजार ७५१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, २५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६८ टक्के एवढा झाला आहे. राज्यात दिवसभरात ५२ हजार ३१२ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.
नंदुरबारमध्ये सध्या बिकट परिस्थिती असून तोकड्या आरोग्य यंत्रणेमुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णांमुळे सध्या जिल्ह््यात प्राणवायूयुक्त खाटा, व्हेंटिलेटरची कमतरता असून यामुळे खासगीसह शासकीय रुग्णालयातही खाट शिल्लक नसल्याचे फलक लागले आहेत. रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे नातेवाईकांना वणवण भटकंती करावी लागत आहे.
शासकीयवगळता जिल्ह््यातील सर्वच खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर मिळत नाही. त्यामुळे जे नेते अथवा सेवाभावी संस्थांकडून अल्पदरात रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले जाते, त्या ठिकाणी लोकांच्या अक्षरश: लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. दिवसाला आलेला साठा अपुरा पडत असल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन घेण्यासाठी गुजरात, नाशिक, मुंबईकडे धाव घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय’
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- पहिल्याच सामन्यात युनिवर्सल बॉस गेलचा विक्रम; आयपीएलमधील पहिलाच खेळाडू
- देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती
- रेमेडेसिवीर ‘व्हेंटिलेटर’ वर! इंजेक्शनचा साठा उपलब्ध राहील, असे नियोजन करा: पालकमंत्री टोपे


