औरंगाबाद : राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वासाठी वर्षभरापासून खल सुरू असलेल्या काँग्रेसने राज्यातील नेतृत्वबदलावर नुकताच निर्णय घेतला. नव्या काँग्रेस कार्यकारिणीत जुन्या-नव्यांची सांगड घालत राज्यातील पक्षाचा सुकाणू नाना पटोलेंकडे सोपवला आहे. महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला तो मराठवाड्यातील नेत्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये. यातून मराठवाड्यातील जातीय गणितांचा व इतर प्रभावी पक्षांचा विचार करून विविध नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्याचे दिसून येते.
नव्या कार्यकारिणीतून काँग्रेसने मराठवाड्यात सोशल इंजिनिरिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे. यात औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार एम. एम. शेख यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. तर जालना येथून आमदार कैलास गोरंट्याल, हिंगोलीतून राहुल गांधी यांच्या युवा ब्रिगेडमधील खासदार राजीव सातव, नांदेडमधून मंत्री अशोक चव्हाण, बीडच्या माजी खासदार रजनी पाटील, लातूरचे बसवराज पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री लातूरचे शिवराज पाटील चाकुरकर, वैद्यकीय व उच्च शिक्षण राज्यमंत्री अमित देशमुख या काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांची निवड केली आहे. या माध्यमातून काँग्रेसने आता जुन्या-नव्याची सांगड घालत मराठवाड्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी पक्ष बळकटीवर भर दिल्याचे दिसून येते.
अशा पद्धतीने मराठवाड्यातील जुन्या-नव्या मातब्बर राजकारण्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात घेतले आहे. आता विधानसभा, लोकसभा निवडणुकादेखील नाहीत. दिवंगत विलासराव देशमुखांच्या काळात पक्षाला जी झळाळी होती, ती मागच्या काही वर्षांमध्ये ओसरल्याचे दिसते. ग्रामीण भागांत राष्ट्रवादीनेही आपला पाया मजबूत केलेला आहे. भाजप तसा शहरी भागातील पक्ष म्हणून ओळखला जातो, पण आता नव्या प्रचारतंत्राच्या जोरावर ग्रामीण भागातील मतेही आकर्षित करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे.
मराठवाड्यातील काँग्रेसचे दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत शंकरराव चव्हाण हे मोठे नेते होते; आता राजकारणातील पुढची पिढी अमित देशमुख, अशोक चव्हाण यांनी काही अंशी काँग्रेसला सावरण्याचे काम केले. भाजपचा विजयी रथ अवघा देश पादाक्रांत करत असताना या पडझडीच्या काळातच काँग्रेसला महाविकास आघाडीच्या रूपाने संधी चालून आली. यावरून आता पक्षाची मोट नीट बांधण्याचे काम सुरू आहे.
काँग्रेसचा एकेकाळचा राज्यातील मोठा चेहरा म्हणजे अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात पक्षाला मरगळ आली होती. यामुळेच आता एम.एम. शेख यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देऊन पुन्हा जिल्ह्यात पक्षाची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2014 मध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून शेख यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीतील डावपेच, जनसंपर्क, अल्पसंख्याक समाजावर पकड या शेख यांच्या जमेच्या बाजू आहेत. असे असले तरी मागची ५ वर्षे ते राजकारणापासून काहीसे दूरच राहिले होते. परंतु काँग्रेसने येथे त्यांना पुढे आणून पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी राम मंदिरासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी !
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- चीनच्या लसीवर विश्वास नाही : पाकिस्तान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

