🕒 1 min read
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथे गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना तब्बल वर्षभरानंतर महापालिकेतर्फे मंगळवारी (ता.27) पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आलेले असताना निम्मीच म्हणजे केवळ पाच लाख रुपयांवर शिंदे कुटुंबीयांची बोळवण करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी काकासाहेब शिंदे हुतात्मा झाले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र त्यानंतर प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना त्याचा विसर पडला. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले होते.
दरम्यान, महापौरांनी दोन दिवसांमध्ये मदत दिली जाईल असे घोषित केले; मात्र औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही मदत लांबणीवर पडली होती. आचारसंहिता संपताच मंगळवारी काकासाहेब यांची आई मीराबाई, वडील दत्तात्रेय शिंदे यांच्याकडे पाच लाख रुपये रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी, सभागृहनेते विकास जैन, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, राज वानखेडे, अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी, मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ऍड. सुवर्णा मोहिते विक्कीराजे पाटील, हेमंत देशमुख यांची उपस्थिती होती.
महापौरांनी व्यक्त केली दिलगिरी
महापालिकेतर्फे 10 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली होती; मात्र कायदेशीर अडचणीमुळे फक्त पाच लाख रुपयांची मदत दिली जात आहे. महापालिकेतर्फे मदतीचा धनादेश देण्यासाठी तब्बल वर्षभराचा कालावधी लागल्यामुळे महापौरांनी शिंदे कुटुंबीयांकडे दिलगिरी व्यक्त केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
