मुंबई : यंदा संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. अशातच राज्यात परतीचा पाऊस, कीड, अतिवृष्टी, आदी संकटांची भर पडत आहे. तर, नुकतीच अवघी मुंबई वीजसंकटात सापडल्याच पाहायला मिळालं. दोन दिवसांपूर्वी मुंबईसह उपनगरामध्ये अचानक वीज पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली. सर्वसामान्य लोकांपासून ते जवळपास सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. कोविड महामारी काळात रुग्णालयात रुग्णांचे हाल झाल्याचे देखील त्यामुळे पुन्हा एकदा निदर्शनास आले होते.
दरम्यान, वीज पुरवठा खंडित होण्याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केलं आहे.सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज गेल्याचं ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी ट्विट करत नवी खळबळ उडवून दिली आहे. “सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असं ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.
मा. @NitinRaut_INC , महापॉवरकट बाबत आपलं ट्विट वाचलं. तुम्ही म्हणत आहात की, हा घातपात असू शकतो. मीसुद्धा मुख्यमंत्री जी यांना कित्येक महिन्यांपासून हेच सांगत आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीच या सरकारसोबत सतत घातपातच करत आहेत.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 14, 2020
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या ट्विटनंतर नवा विषय चर्चेत आला आहे. राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नितीन राऊत यांचं महापॉवरकटबाबत आपलं ट्वीट मी वाचलं. तुम्ही म्हणत आहात की, हा घातपात असू शकतो. मीसुद्धा मुख्यमंत्री जी यांना कित्येक महिन्यांपासून हेच सांगत आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीच या सरकारसोबत सतत घातपातच करत आहेत.’ असं ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांनी एक प्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सूनबाईंना विचारा- प्रीतम मुंडे
- विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठीही होणार ठाकरे-कोश्यारी संघर्ष ?
- मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ
- जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; मुंबईत आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील


