अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी असुन, या निर्णयाचा तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे. तसेच केंद्र सरकार शेतकरी विरोधीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनिल देठे पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देण्याऐवजी अधिक अडचणीत आणण्याचे महापाप केले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. मार्च, एप्रिल महिन्यात काढलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारभाव कमी असल्याने कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला होता.
गेली पाच ते सहा महिने हा कांदा साठवून ठेवलेला असल्याने यातील ५० टक्के कांदा खराब झाला आहे. कांद्याच्या वजनात देखील मोठी घट झालेली आहे. आता सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होऊ लागली होती. कांद्याचे दर वाढत असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात येताच केंद्र सरकारने सोमवारी तातडीने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाल्याची बातमी येताच कांद्याचे दर प्रचंड कोसळले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने गेली पाच ते सहा महिने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधीच असल्याचे या निर्णयामुळे स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन कांदा निर्यात सुरू करावी अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असे देठे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- आपल्याला कोरोनाची लागन झाली तर बेड्स मिळावेत, यासाठी आधीच श्रीमंतांनी बेड आरक्षित करून ठेवले आहेत
- कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर हटवा- निलेश लंके
- आदिवासी भागातील विद्यापीठाचे मॉडेल आवडले उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना… नक्की वाचा काय आहे हे मॉडेल!
- ‘या’ जिल्ह्यातील लोकांचे घरदार शेतजमीन सारेच वाहून गेले पण पालकमंत्र्यांना साधा संवादही साधण्यास उसंत नाही
- मुस्लिम समाजाला तातडीने आरक्षण द्या!


