🕒 1 min read
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत रणकंदन झाले. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गिरीश महाजन, आशिष शेलार, जयकुमार रावल, संजय कुटे यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित एक ठराव मांडला. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मिळवण्यासंबंधी हा ठराव होता. त्यास भाजपच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. त्या वेळी काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. तालिका अध्यक्षांसमोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. सभागृह तहकूब झाल्यानंतरही हे सदस्य शांत झाले नाहीत. त्यांनी दालनातही गोंधळ घातला. अध्यक्षांना शिवीगाळ केली. स्वत: तालिका अध्यक्षांनी ही माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप सदस्यांच्या या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत सत्ताधारी पक्षाने निलंबनाचा ठराव आणला. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हा ठराव मांडला. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘भाजपा ही काही साधीसुधी पार्टी नाही, १०६ आमदार निवडून आलेली पार्टी आहे. आज तुम्ही १०६ आमदार असलेल्या भाजपाचा आवाज सभागृहात दाबण्याचा प्रयत्न करत आहात, या विरोधात आम्ही आवाज उठवू. राज्यपालांकडे निलंबित केलेले १२ आमदार गेले होते, आता आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू. हा अन्याय आहे. अशाप्रकारचे सगळे निर्णय गोळा केल्यानंतर असं लक्षात येतं की, आपल्याला न्यायालयात न्याय मिळेल’ असे पाटील म्हणाले.
सुप्रीम कोर्टातही गेलात तरी निलंबन रद्द होणार नाही
‘भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या विरोधात न्यायालयात जायचे असेल तर जाऊ दे. सर्वोच्च न्यायालयानेच सभागृहात होणारे बेशिस्त वर्तन धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यावर कारवाईबाबतही सुप्रीम कोर्टाने निर्देशही दिले आहेत. कोर्ट असे म्हणत असताना हा प्रकार घडला आहे. त्यांना न्यायालयाकडून काहीही फायदा होणार नाही. सभागृह सर्वभौम असत. त्यामुळे या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा प्रयत्न योग्य ठरेल असे वाटत नाही’ असा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची मोठी घोषणा! राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५०१ रिक्त पदे भरणार
- ‘चिंधीचोर भास्कर जाधव स्वतःच्या घरात बाहेरून कडी लावून झोपतो, त्याला मुंगीही मारणार नाही’
- ‘सर्व केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?’, फडणवीसांचा हल्लाबोल
- ‘अभिरूप विधानसभा भरवणाऱ्या भाजप सदस्यांवर कारवाई करा’, जयंत पाटलांची मागणी
- ‘महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली’, फडणवीसांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
