मुंबई : कॉंग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्य पदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती.
या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. तर, रजनी पाटील यांनी खासदारकी बिनविरोध पक्की झाल्यानंतर भाजपचे आभार मानले आहेत.
‘मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते’, असं म्हणत रजनी पाटील यांनी सातव यांचा आवर्जून उल्लेख केला. तसेच, सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला,दिल्लीत मला आशीर्वाद मिळाले. राज्यातून देखील अनेकांनी पुढाकार घेऊन ही मला संधी मिळाली. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी समजूतदारपणानं भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला त्यांचे ही आभार मानते, असं देखील रजनी पाटील यांनी म्हटलं.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस नेत्यांची धडपड –
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला.
दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळं आघाडीतील इतर दोन घटक पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने घेतलेल्या पवित्र्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून नाराजीचा सूर आळवला जात असल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची कार्यालयात आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दोन महिलांसह एका व्यक्तीचे नाव
- मुख्यमंत्र्यांची घोषणा! डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये घेणार कॅबिनेट बैठक
- वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल- आशिष शेलार
- राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा अहंकार, गर्दीच्या कार्यक्रमांवरून एसपींना भेटणार-पंकजा मुंडे
- भाजपसोबत युती केल्यास मनसेचाच फायदा; वसंत मोरेंचे सूचक विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

