🕒 1 min read
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराचे पडसाद देशभर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेचा निषेध नोंदविला जात असून प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुभद्रा मुखर्जी यांनी हिंसाचाराचा निषेध करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
सुभद्रा मुखर्जी यांनी 2013 मध्ये बंगाल भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानुसार त्या भाजपमध्ये सक्रीय कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या. मात्र, दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर त्यांनी चिंता व्यक्त करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुभद्रा मुखर्जी यांनी आपल्या सदस्यत्वपदाचा राजीनामा बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांच्याकडे सोपवला आहे.
आपल्या निर्णयासंबंधी बोलताना सुभद्रा मुखर्जी यांनी सांगितलं की, “दिल्लीत काय झालं हे तुम्ही सर्वांना पाहिलं आहे. अनेक लोकांची हत्या करण्यात आली. अनेक घरं पेटवून देण्यात आली. भडकाऊ भाषण करणाऱ्या अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्रा यांच्याविरोधात कोणीही कारवाई करत नाही आहे. नेमकं काय सुरु आहे ? हिंसाचाराची दृश्य पाहून मी प्रचंड बिथरले आहे. फक्त मोजक्या नेत्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पक्षात आपण राहता कामा नये असं मला वाटलं,”
दरम्यान, पक्षाने कधीही विचारसरणीत तडजोड केली नाही. दिल्लीत झालेल्या हिंसाचारात भाजपचा कोणताही हात नाही. मुखर्जी यांनी त्यांच्या निर्णयापूर्वी मला कल्पना दिली होती. सुभद्रा मुखर्जी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असली तरी त्या आपला निर्णय मागे घेतील, असे पक्षातील इतर नेत्यांना आशा आहे, असे दिलीप घोष यांनी सांगितले.
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=x1OMSDr8zqk
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

