🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात भाजप-शिवसेनेत बॅनरवरुन राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानणारे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. मराठवाड्यातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडवल्यामुळे त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. यावर आता शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रेल्वेचे प्रश्न शिवसेनेनेच सोडवल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखीनच रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरण व्हावे, अशी मागणी होत होती. अनेक आंदोलने झाली परंतु या प्रयत्नांना यश आले नाही. नुकतेच अम्ब्रेला या योजनेअंतर्गत ९८ किलोमीटर दुहेरीकरणाला मान्यता देऊन १७ डिसेंबर २०२१ रोजी दुहेरीकरणाचा सर्वे करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जालन्यातून धावलेली किसान रेल्वे, जालना पुणे मार्गावर सुरु करण्यात आलेली नांदेड-हडपसर रेल्वे या तिन्ही कामांसाठी रावसाहेब दानवेंचे भाजपद्वारे आभार मानण्यात आले आहेत. माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी शहरात रावसाहेब दानवे यांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत. ‘करून दाखवले’ या आशयाचे हे बॅनर आहेत. विशेषतः शिवसेना नेत्यांच्या बाजूला हे बॅनर लावल्याने नवीनच वाद उफाळून आला आहे.
शिवसेनेने अनेक रेल्वे आणल्या
याबाबत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेने अनेक रेल्वे आत्तापर्यंत सुरु केल्या आहेत. आता ही लोक उद्घाटन केल्यानंतर लगेचच बॅनरबाजी सुरु करतात. फार पूर्वी मी लोकसभेत असतांना त्याकाळी सोशल मीडिया नव्हता. मात्र आता काहीही केले कि सोशल मिडिया आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून आम्ही विकासकामे केल्याचा डंका ही लोक पिटत असतात.
रावसाहेब दानवेंनी मराठवाड्याचा विकास केला
प्रमोद राठोड यांनी मराठवाड्यातील जनतेसाठी रावसाहेब दानवे यांनी जी कामे केली आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी हे बॅनर लावल्याचे सांगितले. राठोड म्हणाले, “रेल्वे राज्यमंत्री पद रावसाहेब दानवे यांना मिळाल्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या, प्रत्यक्षात या मार्गावर मालवाहतूक कमी असल्यामुळे दुहेरीकरणाच्या बातम्या अनेक दिवसांपासून वृत्तपत्रात आलेल्या होत्या. परंतु रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन या विषयाबाबत रेल्वे विभागाचा आढावा घेतला. त्यामुळे हे शक्य झाले.”
महत्वाच्या बातम्या-
- ‘…म्हणून मी अनिल देशमुखांचे आभार मानतो’
- ‘मी अजित दादांचा फॅन’; भाजप आमदाराने कौतुक करताच राष्ट्रवादीची ऑफर
- पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
