मुंबई : देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण सुरु करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं सरसकट लसीकरण केलं जाणार आहे. तब्बल ५ कोटी ७१ लाख जनतेचं मोफत लसीकरण केलं जाणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यात १८ ते ४४ वयोगटातील जनतेचं लसीकरण राज्य सरकारमार्फत केलं जाणार आहे. याचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असून लसीकरणाच्या खर्चासाठी ६५०० कोटी रुपये सरकारतर्फे खर्च करण्यात येणार आहे.’
यासोबतच, ‘पुढील सहा महिन्यात या वयोगटातील लसीकरण करायचे असल्यास एका महिन्याला २ कोटी नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. मात्र, देशात सध्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपनीचे लस उपलब्ध आहेत. कोव्हीशील्डने महिन्याला १ कोटी लसींचा पुरवठा करण्यास समर्थता दर्शवली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रशियन लस स्फुटनिक याबाबत विचारशील आहेत. यासोबतच, इतर कंपन्यांच्या लसी देखील आयात करण्याची तयारी सुरु आहे. मात्र, सध्या उपलब्ध साठा नसल्याने इच्छा असूनही १ मे पासून मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे शक्य नाही.’ असं भाष्य टोपेंनी केलं आहे. त्यामुळे १८ वर्षांपुढील नागरिकांना काहीशी वाट बघावी लागणार असून संयम बाळगावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, ‘लसीकरणासाठी नोंदणी करण्यासह स्लॉट बुकिंग करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊ नये याबाबत तयारी सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणास सुरुवात केली जाईल. लस ही फक्त राज्य शासनाच्या सरकारी रुग्णालयातच मोफत दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी पैसे मोजावे लागतील.’
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच ठरलं ! अखेर राज्यात १८ ते ४४ वयोगटासाठी सरसकट मोफत लसीकरण
- ‘गोकुळ’साठी राजू शेट्टींच ठरलं; निवडणुकीत ‘या’ गटाला जाहीर केला पाठींबा
- रश्मी शुक्लांनी CBI चौकशीत दोन ‘अनिल’ आणि बड्या नेत्याचं नाव घेतलं; भाजप नेत्याचा दावा
- ‘चव्हाणसाहेब, महाराष्ट्र निष्क्रिय सरकार आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजतोय त्यावर आधी बोला’
- ‘एक कोटी देतो, रेमडेसिविर द्या…रुग्णांचे जीव तरी वाचतील’; शिवसेना आमदाराचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

