मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात, आरोग्य क्षेत्राच्या बरोबरीने शेती क्षेत्रालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने केलेल्या कॉर्पोरेट धार्जिण्या व शेतकरी विरोधी 3 कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार करत, बाजार समित्यांच्या बळकटीकरणास प्राधान्य देण्याची स्वागतार्ह भूमिका घेतल्याचं प्रतिपादन अखिल भारतीय किसान सभेच्या डॉ. अजित नवले यांनी केलं आहे.
तर, ‘बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली. विकेल ते पिकेल या धोरणानुसार राज्यात पिकनिहाय मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी 2100 कोटी रुपयांची तरतूद केली. कृषी संशोधनासाठी कृषी विद्यापीठांना प्रतिवर्ष 200 कोटी याप्रमाणे 3 वर्षासाठी 600 कोटींची तरतूद केली. वीज जोडणी व सिंचनालाही प्राधान्य दिले. यामुळे कृषी क्षेत्राला उभारी देणाऱ्या या घोषणांचे स्वागत आहे,’ असं नवले म्हणाले.
मात्र, ‘या जोडीला अर्थसंकल्पाच्या निमित्ताने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी व विस्तार होईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. अर्थमंत्र्यांनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा उल्लेख केला, मात्र 2 लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याबाबत मौन बाळगले. शिवाय यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या अंमलबजावणी बाबतही निराशाजनक मौन बाळगले,’ असं देखील अजित नवले यांनी नमूद केलं आहे.
तर, ‘कोरोना काळात उत्पन्न बुडल्यामुळे या काळात थकलेले शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची आवश्यकता होती. राज्य सरकारने यात अंशतः व सशर्त दिलासा दिला मात्र वीजबिल संपूर्णपणे माफ करण्याबाबतही शेतकऱ्यांची निराशा केली आहे,’ असं भाष्य अजित नवले यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प; राम सातपुतेंची टीका
- #Maharashtrabudget2021: यंदाच्या अर्थसंकल्पातून पुण्याला काय मिळाले?
- विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे; आठवले घेणार मोदींची भेट
- यंदाच्या अर्थसंकल्पात जीर्ण शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटींची तरतूद
- राज्यात दारु महागणार! अर्थसंकल्पात अजित पवारांनी वाढवला कर


