🕒 1 min read
औरंगाबाद: ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आज (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची जाहीर सभा होणार आहे. सभेची शिवसैनिकांकडून गेली कित्येक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शिवसैनिकांनी पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा उल्लेख केला आहे. मात्र त्यापूर्वीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jali) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित १५ मुद्द्यांवर भाषण करण्याची मागणी केली आहे.
औरंगाबाद येथे ८ जून रोजी पूर्वनियोजित सभेत आपण नेहमी प्रमाणे धार्मिक मुद्दे मंदिर-मस्जिद , हिंदु-मुस्लिम , औरंगाबाद- संभाजीनगर नामांतरण आणि इतरांवर राजकीय टिका-टिपण्णीचे भाषण देऊन औरंगाबादकरांची विकासाच्या मुख्य मुद्यावरून दिशाभुल न करता औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित असलेले मुलभुत सुविधेची कामे , प्रकल्प व प्रस्ताव पूर्ण होणार आहे किंवा नाही, याबाबत खुलासा करावा. अशी मागणी इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री साहेब आजच्या सभेत तुमचे धार्मिक/ भावनिक मुद्दे असतील ते असतील मात्र कृपा करुन सामान्य औरंगाबादकरांची अपेक्षा आहे की या पंधरा मुद्द्यांवर आपण भाषणात बोलाल ! @OfficeofUT @ShivSena pic.twitter.com/qdAJJMOsqQ
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) June 8, 2022
‘ते’ पंधरा मुद्दे :
1 . औरंगाबाद शहराला मुबलक व वेळेवर पाणी मिळणार आहे किंवा नाही ? पाणी मिळणार असेल तर अचुक महिना आपण जाहीर करावा .
2 . औरंगाबादला मंजुर झालेले क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे . औरंगाबाद येथे परत आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न व त्याची सद्यस्थिती जाहीर करून क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी निधीचे नियोजन कसे करण्यात आले आहे कृपया त्याची माहिती जाहीर करावी.
3 . औरंगाबाद येथे मंजूर झालेले एम्स् इन्सटिट्युट ( All India Institute of Medical Science AIIMS ) कधी पूर्ण होणार आहे किंवा नाही? कृपया याचा खुलासा करावा.
4 . औरंगाबाद येथे मंजुर झालेले International Institute of Planing & Architecture कधी सुरु होणार आहे? कृपया त्याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा.
5 . औरंगाबाद विमानतळ येथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा कधी सुरु होणार आहे किंवा नाही ? कृपया याचा खुलासा करून आखाती देशाकरिता विमानसेवा कधी सुरु होणार आहे याची तारीख जाहीर करावी. तसेच हज उमराह यात्रेकरू साठी औरंगाबादहून थेट विमानसेवा कधी सुरु होणार आहे? कृपया याचा सुध्दा खुलासा करावा.
6 . औद्योगिक परिसरात उद्योगांना चालना देण्यासाठी नव्याने सर्व सोयीसुविधायुक्त ऑरिक सिटी उभारण्यात आलेली आहे , त्याठिकाणी नविन कंपन्या येणार आहे किंवा नाही? कृपया याचा खुलासा करावा. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याला राज्याचे उद्योगमंत्री हेच पालकमंत्री म्हणून लाभले आहे. दावोस स्वित्झर्लंड येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत जगभरातील नामांकित कंपन्यांचे अधिकारी व उद्योगपती यांच्या सोबत चर्चा करून पहिल्याच दिवशी विविध 23 हुन जास्त देशातील कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात आल्याचे शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. राज्यात हजारो कोटींची गुंतवणुक होवुन लाखो बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आला होत . त्यापैकी ऑरिक सिटी येथे किती कंपन्यांचे काम सुरु झाले? किती गुंतवणुक झाली? तसेच किती युवकांना रोजगार मिळाला? विशेष म्हणजे दावोस येथुन शहराला काय आणले? कृपया त्याचा खुलासा करावा.
7 . महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विकासाकरिता किती निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे अथवा नियोजित करण्यात आले आहे? तसेच राज्यातील हजारो हेक्टर वक्फ मिळकतीचे संरक्षण करण्यासाठी कृपया आपले धोरण जाहीर करावे.
8 . औरंगाबाद येथील सफारी पार्क पूर्ण होण्यासाठी आणखी किती दशके लागणार? कृपया खुलासा करण्यात यावा.
9 . औरंगाबाद शहरात मागील 30 से 40 वर्षांत आरक्षीत जागेवरील विकसित झालेल्या सर्व गोरगरीब वसाहतीमधील आरक्षणे रद्द कधी होणार? औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत शहर विकास आराखड्यातील हरित पट्टयात व आरक्षीत जागेवर विकसित झालेल्या वसाहतींना गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमितीकरण करण्याची परवानगी कधी मिळणार? कृपया जाहीर करण्यात यावा.
10 . सातारा देवळाई भागात भुमिगत मलनिःसारणासाठी निधी कधी उपलब्ध होणार ? परिसरातील नागरीकांना मुलभुत सुविधा कधी मिळणार ? कृपया याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा.
11 . शिर्डी या 112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ लवकरच होणार असल्याचे आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जाहीर केले होते ते कधी होणार? कृपया जाहीर करावा.
12. दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनी आपण भाषणात भाविकांसाठी शिर्डी विमानतळ औरंगाबादशी जोडणार असल्याचे जाहीर केले होते ते कधी होणार? कृपया खुलासा करावा.
13. औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्या औरंगाबाद महानरगपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इतर शासकीय विभाग व आस्थापनेत काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना शासन निर्णय , परिपत्रक व कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन , पी.एफ. , ई.एस.आय. सी व इतर योजनांचा लाभ मिळणार आहे किंवा नाही? याचा खुलासा करुन कामगारांची आर्थिक पिळवणुक व कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शासकीय कार्यालय , विभाग व आस्थानांविरुध्द केलेल्या कार्यवाहीची माहिती जाहीर करावी.
14 आपला पक्ष शिवसेना व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता असतांना निवासी वसाहती , व्यावसायिक प्रतिष्ठान , उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी नाल्यांतून उघड्यावरून वाहू नये म्हणुन 464 कोटीची निविदा मंजुर करुन भूमिगत गटार योजना राबविण्याचा संपूर्ण ठेका खिल्लारी कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आला होता. परंतु योजना पूर्ण न करता तत्कालीन सत्ताधारी यांच्यासोबत संगणमताने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला होता. सबब प्रकरणी संबंधितांविरुध्द कायदेशिर कारवाई करुन नागरीकांचे पैसे हडपणाऱ्याकडून वसुली करण्यात आली आहे किंवा नाही? कृपया खुलासा करावा.
15. आपला पक्ष शिवसेना व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता असतांना शहर विकासाचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता . तत्कालीन शिवसेना भाजपा सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधीचा भ्रष्टाचार करण्यासाठी सर्वसाधारण सभेला अधिकार नसतांना आराखड्यात सर्व नियम डावलून सोयीनुसार बदल केले. त्यामुळे संपुर्ण आराखडाच रद्द झाला होता. तत्कालीन शिवसेना व भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी आर्थिक तडजोड करून केलेल्या महाभ्रष्टाचारामुळे शहराच्या विकासाला चांलगीच खीळ बसुन शहराचे वाटोळे होवुन संपुर्ण शहर 20 वर्ष मागे गेले आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत झालेल्या हजारो कोटीच्या महाभ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व संबंधितांविरुध्द आपण कायदेशिर कारवाई करणार आहे किंवा नाही? कृपया आपण याचा जाहीररित्या खुलासा करावा.
ही पंधरा मुद्दे पत्रात मांडली आहेत. तसेच औरंगाबादकर आपल्या सभेच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहे कृपया आपण अपेक्षाभंग करणार नाही हिच अपेक्षा असल्याचेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कभी ईद कभी दिवाली’या चित्रपटाच्या सेटवर भाईजानला सुरक्षा! ‘अशी’ घेतली जाते काळजी
- “पंकजा मुंडेच्या तिकिटासाठी देवेंद्र फडणवीसांसह सगळ्यांनी प्रयत्न केले, पण…” – चंद्रकांत पाटील
- “नूपूर शर्मा म्हणजे संपूर्ण भारत नव्हे”, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
- बीसीसीआय आयपीएलचे मीडिया ब्रॉडकास्ट राईट्स विकणार; याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या…!
- “…तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते”, छगन भुजबळ यांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
