🕒 1 min read
मुंबई: ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारताचे आव्हान संपुष्टात आल्याबरोबरच रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. दरम्यान त्यांनी रोहित शर्माच्या रूपात भारताकडे ट्वेन्टी-२० प्रकाराच्या कर्णधारपदासाठी एक उत्तम पर्याय असून नवनिर्वाचित प्रशिक्षक राहुल द्रविडच्या सहयोगाने रोहित-द्रविड जोडी टीम इंडियाला नव्या शिखरावर नेईल, अशी प्रतिक्रिया माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली आहे.
विराट कोहलीने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्याने आता भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाला प्रारंभ होणार आहे. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारणार असून न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अनुभवी सलामीवीर रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी रोहित पूर्णपणे सज्ज आहे. गेल्या जवळपास दशकभरापासून तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा ‘आयपीएल’ जिंकली आहे. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वकौशल्याविषयी शंकाच नसल्याचे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
याबरोबरच खेळाडूंवरील खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असल्याचेही शास्त्री यांनी म्हटले आहे. तसेच मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व केले, तर अन्य कर्णधार फक्त कसोटीवर लक्ष केंद्रित करू शकतो,असेही रवी शास्त्री यांनी सांगितले. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार असून त्यानंतर २०२३मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. द्रविडला परिपक्व आणि प्रतिभावान भारतीय खेळाडूंचा संच मिळालेला आहे. त्यामुळे भारताची ‘आयसीसी’ जेतेपदाची प्रतीक्षा लवकरच संपेल, याची मला खात्री आहे. असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- झीलंडविरुद्ध टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा भूषविणार कर्णधारपद
- T20 WC: आज रंगणार उपांत्य फेरी; इंग्लंडपुढे न्यूझीलंडचे आव्हान
- ये तो हसीना का नवाब निकला….; फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपची टीका
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ‘या’ दिग्गज खेळाडूंना ठेवले संघाबाहेर

