🕒 1 min read
अहमदनगर : ६ नोव्हें.रोजी अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात कोरोनाबाधित १७ रुग्ण उपचार घेत होते. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेची होरपळ होत असल्याचे म्हणत सरकारने केवळ आश्रू ढाळू नये, असा टोला लगावला आहे.
यासंदर्भात राऊत लेखात म्हंटले आहे की,’राज्यात दिवाळी साजरी होत असतानाच नगरच्या दुर्घटनेने आनंद होरपळून खाक झाला आहे. नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास शनिवारी आग लागली. त्यात ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू व्हावा हे धक्कादायक आहे. अतिदक्षता विभागात रुग्णांना प्राण वाचविण्यासाठी आणले जाते, पण गेल्या दोनेक वर्षांत राज्यातील रुग्णालयांत अनेक ठिकाणी अग्नितांडव भडकले. या आगीची ठिणगी बहुतेक वेळा अतिदक्षता विभागातच पडली असल्याचे दिसत आहे. आतादेखील नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागासच आग लागली आणि त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. गोंदिया, नाशिक, मीरा-भाईंदर, वसईसारख्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांत इस्पितळांना आगी लागल्या. त्यात अनेक कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. अशा आगी लागून प्राणहानी झाली की, लोकांच्या संतापाचा तेवढ्यापुरता उद्रेक होतो. विरोधी पक्षाचे लोक राजकीय थयथयाट करतात. सरकार चौकशीचे आणि कठोर कारवाईचे आदेश देते. अश्रू ढाळून मृतांच्या नातेवाईकांना दोन-पाच लाखांची मदत करते, पण अशा दुर्घटनांचा सिलसिला कायम राहतो. इस्पितळांना आगी लागायच्या काही थांबत नाहीत. फक्त आगीची कारणे शोधायची व मागच्या आगीचे पान पुढे ढकलायचे असे वर्षानुवर्षे चालले आहे.
तसेच नगरची आग म्हणे शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे. अतिदक्षता कक्षाचे फायर ऑडिट करण्यात आले होते अशी माहिती नगरचे जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली आहे. तरीही रुग्णांचा मृत्यू हा गुदमरून झाला की होरपळून झाला हे तपासून पाहू असे सांगण्यात आले. मृत्यू जळून झाला की गुदमरून, हे जरूर तपासा, पण मृत्यू इस्पितळास आग लागल्यामुळेच झाला व जनतेचे रक्षण, संरक्षण करणे हे कोणत्याही सरकारचेच कर्तव्य असते. या ठिकाणी आग का भडकली याची विविध कारणे आता समोर येत आहेत, असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.
दरम्यान, अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर्स हे पीएम केअर्स फंडातून देण्यात आले होते. ते निकृष्ट दर्जाची होते व त्यामुळेच शॉर्टसर्किट झाले असावे असा संशय आमदार रोहित पवार यांना आहे. आग कशाने लागली व भडकली या संशोधनातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत, असेही राऊत लेखात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
- ‘अशाने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर कृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढतोय’
- ‘वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा’, संदीप देशपांडेंनी पोस्ट केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
