मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून याप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच नवाब मलिक यांच्यावर देखील जोरदार टीका केली जात आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून एनसीबीच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे.
शनिवारी समीर वानखेडे यांनी मुंबईत राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली होती. यानंतर हलदर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री मलिक यांच्यावर निशाणा साधला. ‘एक अधिकारी आपलं काम करत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री त्या अधिकाऱ्यावर व्यक्तिगत आरोप करत आहे. अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहे. यामागे कारण काय? त्याची चौकशी झाली पाहिजे’, असे अरुण हलदर यांनी म्हटलंय.
संबंधित अधिकारी मदतीसाठी आयोगासमोर आला होता. त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. पण अनुभवाने मी सांगतो की, त्यांचे जात प्रमाणपत्र योग्य आहे. तरीही आम्ही आयोगामार्फत जात प्रमाणपत्राची चौकशी करत आहोत. एक अधिकारी आपले चुकीचे सर्टिफिकेट आयोगासमोर देणार नाही. कारण, त्याची नोकरी धोक्यात येणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे काही लोक समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आयोगाकडून हे होऊ दिलं जाणार नाही, असही अरुण हलदर म्हणाले.
तर दुसरीकडे मलिक यांनी अरुण हलदर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हलदरजी, तुम्ही संवैधानिक पदावर बसला आहात, त्यांची प्रतिष्ठा राखा. समीर वानखेडे यांनी धर्मांतर केले नाही कारण ते जन्माने मुस्लिम आहेत, त्यांच्या वडिलांनी धर्मांतर केले आहे. एससी प्रमाणपत्रात खोटेपणा करून एका गरीब एससीचा हक्क हिरावून घेत समीर वानखेडे त्या पदावर बसले आहेत.’ असा आरोप मलिक यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भावना गवळींना ईडीची नोटीस मिळताच चिकनगुनिया झाला, इतका हा गंभीर रोग’, भातखळकरांची खोचक टीका
- उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती
- ‘…त्यांनी ठाकरे सरकारचे बाप असलेल्या शरद पवारांना दाऊदसोबत कोण बसलं होतं?’, हे विचारावं
- देशभरात काँग्रेस पक्षाला सोडून कोणतीही आघाडी होऊ शकत नाही; संजय राऊत यांचे मत
- ‘दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार’, किरीट सोमय्यांचा इशारा


