मुंबई : राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षानं काल राज्यभरात शंखनाद आंदोलन केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिरांसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तसे स्पष्ट संकेत दिलेत. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
मंदिरांच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी सरकारला सुनावलं. ‘मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस जाऊ द्या. नंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची बैठका घेणार आहे. त्यात आम्ही याबाबत चर्चा करूच. सगळी मंदिरं उघडलीच पाहिजेत नाहीतर सगळ्या मंदिरांच्या बाहेर घंटानाद करू,’ असा इशाराच त्यांनी दिला. घराबाहेर पडायला ह्या लोकांची फाटते, त्यात आमचा काय दोष?,’ असा सवालही राज यांनी केला.
राज ठाकरेंच्या या इशाऱ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा आमचा नाद करु नका, असे पेडणेकर यांनी म्हटले. ‘राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. मात्र भावनेचा नाही तर लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बीळात जाऊन लपतात’, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना लगावला.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दहिहंडीवरून मनसेवर निशाणा साधला. ‘काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही. कोरोनाचे नियम तोडून आम्ही करुन दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. नियमांना विरोध करायला हा सरकारी कार्यक्रम नाहीये. फुकट कोरोना वाटप केलं जातंय,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार सपशेल नाकाम ठरले – काकडे
- आयपीएलमध्ये पुन्हा १० संघ! स्पर्धेचे स्वरुपही बदलण्याची शक्यता
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’

