औरंगाबाद : इमारतीच्या वापरापूर्वी नियमानुसार भोगवटा प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचा शासन नियम आहे. मात्र शहरात हजारो इमारतींचा महापालिका प्रशासनाकडून भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू आहे. वारंवार आवाहन केल्यानंतरही बांधकाम व्यावसायिक, व्यावसायिक इमारती उभारणारे नागरिक भोगवटा प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र न घेता इमारतींचा वापर करणाऱ्या १२३८ जणांची यादी तयार केली आहे. कारवाई करण्यासाठी स्वतंत्र सेलही सुरू करण्यात आला आहे.
शहर परिसरात महापालिकेतर्फे दरवर्षी एक हजारांपेक्षा जास्त बांधकामांना परवानगी परवाने दिले जातात. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इमारतीचा वापर करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मात्र त्यातील बोटावर मोजण्याएवढेच लोक भोगवटा प्रमाणपत्रासाठी येतात. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. अनेक बांधकाम व्यवसायिक भोगवटा न घेता फ्लॅट, रो हाऊस विक्री करतात. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होते. त्यामुळे यासाठी आता महापालिका प्रशासनाने स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.
याची जबाबदारी उप अभियंता ए. बी. देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. या कक्षात अठरा कर्मचारी आहेत. या क्षेत्रात गेल्या सात वर्षांतील बांधकाम परवानगीची तपासणी करून त्यातील भोगवटा न घेतलेल्यांची यादी तयार केली जाणार आहे. याविषयी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक जयंत खरवडकर यांनी सांगितले, भोगवटा घेणे बांधकाम व्यावसायिकांची नैतिक जबाबदारी आहे. ज्यांनी भोगवटा न घेताच मालमत्तेची विक्री केली आहे. अशा बांधकाम व्यावसायिकांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत व रीतसर शुल्क भरून भोगवटा प्रमाणपत्र द्यावे.
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसोबत विमा कंपन्यांचा अन्याय, सखोल चौकशीची भाजपची मागणी
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- नारायण राणेंनी संभाजीराजेंवर केलेली टीका योग्य नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
