मुंबई : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीबाबत योग्य निर्णय करतो, असा शब्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवारी दिला. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. गेल्या ९ महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी द्यावी, अशी विनंती केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे असे चार सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी रात्री ७.३० वाजता राजभवनवर गेले होते. या शिष्टमंडळाची सुमारे तासभर राज्यपालांशी चर्चा झाली.
या भेटीनंतर शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी १२ आमदारांच्या मुद्द्यावरून राज्यपालांना टोला लगावला आहे. ‘भेटीनंतर राज्यपालांनी त्यांचा निर्णय कृतीतून दाखवावे. तिथले हसरे फोटो प्रसिद्ध झाल्याने वातावरण प्रसन्न होते असे जाणवते. त्यामुळे येत्या काळात राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील, अशी आशा आहे’ असे राऊत म्हणाले.
‘राज्यपाल दबावामुळे निर्णय घेत असतील तर त्यांनी ते जाहीरपणे सांगावं. राजभवन आणि सरकारमध्ये आतापर्यंत संघर्ष झाल्याचा इतिहास नाही. आणि तो जर होत असेल तर तो का होतो याचा विचार राजभवनाने करायला हवा. उच्च न्यायालयाने या प्रकरणात पडण्याची गरज नाही. मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांना राज्यपालांनी मंजुरी देणे हे त्यांचं काम आहे. १२ आमदार हे तालिबानमधून आलेले नाही, ते गुंड नाहीत. ते कलाकार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण काम केले. त्यामुळे राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. कालच्या भेटीनंतर राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली.
राज्यपालांना भेटल्यानंतर अजित पवार काय म्हणाले?
या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी रात्री प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘१२ राज्यपाल नियुक्त आमदारांचा कॅबिनेटचा ठराव झाला होता. त्याबाबतची पुढची कारवाई होण्याबाबत चर्चा करण्यासाठी आली. जर याबाबत लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल. ती विनंती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. राज्यपालांनी आमचं ते म्हणणं ऐकून घेतलं. आमदारांच्या या यादीवर कुठल्याही प्रकारचे आक्षेप वगैरे त्यांनी घेतलेले नाहीत. आम्ही फक्त त्यांना आठवण करुन दिली. कधी मान्यता द्यायची तो जरुर त्यांचा अधिकार आहे’ असे पवार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- रिलायन्स जिओचे खास प्लॅन्स; Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार मोफत


