मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासह महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचा विचार करता अधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आकडेवारी सादर करून तातडीने मदत करावी अशी मागणी केली होती.
त्यानुसार आता महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यात आले आहेत. २१ एप्रिल ते ३० एप्रिलच्या पुरवठ्यामध्ये महाराष्ट्राला ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाची तीव्रता पाहता महाराष्ट्राला प्राधान्य दिल्यामुळे भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. पुढे बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, आता प्रश्न असा आहे की नवाब मलिक, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे रोज सकाळी मीडियात आपला उर बडवणारे आणि अफवा पसरवणारे कार्यशून्य इतर पुढारी हलक्या दर्जाच्या राजकारणातून वर उठून आपल्या पंतप्रधानांची व महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतील? आपण कोरोनाबरोबरची ही लढाई जिंकूच, पण महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे
- झाकीर हुसेन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत दिला धीर
- टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- ‘पवारांचे बस्तान बसविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून सोलापूर जिल्ह्याचा दिला जातोय बळी’
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल


