नागपूर : राज्यात सत्तारूढ असलेल्या शिवसेनेकडे मुख्यंत्रिपद आहे. मुळात ही सुवर्ण संधी समजून विदर्भातील सेनेच्या नेत्यांनी बरेच काही मिळवणे अपेक्षित आहे. मात्र पक्षातील अंतर्गत वाद संपताना दिसत नाही. आ. दुष्यंत चतुर्वेदी यांची नागपूर शहर संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, नागपूर जिल्ह्यातील सेनेच्या गटात मराठी अमराठी वाद उफाळून येण्यास सुरुवात झाली असून, काहींनी मराठी नेतृत्व हवे अशीही मागणी करण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेनेचा माजी शहर प्रमुख मंगेश कढवची फसवणुकीची शेकडो प्रकरणे समोर येत आहेत. त्याने खंडणीतून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. कढववर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर शिवसेनेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली. त्यामुळे जिल्हा पक्षप्रमुख माजी खा. प्रकाश जाधव यांची नियुक्ती रोखली. तसेच कढवला शहर प्रमुखपदावरून तात्काळ काढण्यात आले.
राज्यात शिवसेना सत्तेवर असताना सेना नेत्यांकडून अशी कृत्ये केली जात असल्याने जनतेचा शिवसेनेवरील विश्वास कमी होत आहे. याची तत्काळ दखल घेत सेना पक्षश्रेष्ठींनी आ. दुष्यंत चतुर्वेदी यांची शहर संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली. पण या नियुक्तीमुळे ‘कही खुशी कही गम’ची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आ. चतुर्वेदी यांनी बैठकांचा सपाटा सुरू केला. शिवसेना भवनात बैठक न घेतल्याने त्यांच्यावर टीकाही झाली. त्यावेळी त्यांनी कोरोनाचे कारण पुढे केले.
शहर व जिल्ह्यात शिवसेना कमकुवत होत आहे. महानगरपालिकेत शिवसेनेचे शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया हे उपमहापौर राहिले. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची कामगिरी चांगली राहायची. काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी चांगले मताधिक्य मिळविले होते. जिल्हा परिषदेत सुद्धा मागील कार्यकाळापर्यंत शिवसेनेचे शरद डोणेकर हे उपाध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. परंतु, हल्ली जिल्ह्यातील सेनेची ताकद कमकुवत झाली आहे. महानगरपालिकेत सेनेचे दोनच नगरसेवक आहेत. ते सुद्धा पक्षाच्या नव्हे तर स्वत:च्या ताकदीवर निवडून आलेले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार आहे. परंतु, जिल्हा परिषदेत शिवसेनेचा केवळ एकच जिप सदस्य निवडून आला आहे.
यावरून पक्षाची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरात पक्ष वाढविण्यासाठी नव्याने तरुण, तडफदार आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर आता धुरा सोपविली आहे. येत्या वर्ष दीड वर्षात महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आ. चतुर्वेदी व्यूहरचना आखत आहेत. त्यासाठी त्यांचे वडील व माजी पालकंत्री सतीश चतुर्वेदी यांचा राजकारणातील दीर्घ अनुभवाचा फायदाही मिळत आहे.
मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही ; विनायक मेटेंचा घणाघात
विनायक मेटेंच्या आरोपांवर मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिले प्रत्युत्तर
वधूसह लग्नसोहळ्यातील बारा जणांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

