🕒 1 min read
उस्मानाबाद: खरीप २०२० मध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीपोटी हक्काचा पीकविमा जिल्ह्यातील ८०% शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील विमा कंपन्या, कृषिमंत्री, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली जात नाही. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जनआंदोलनाला मर्यादा आहेत, पण जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी या विषयावर तोंड कधी उघडणार, असा सवाल आ. राणाजगजितसिंह यांनी केला आहे.
जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार निवडून दिले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. खरीपात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेले पिकाचे नुकसान मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः बघितले होते व ‘एकही नूकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही’ असा शब्द दिला आहे. ‘तूमची परिस्थिती बघून वाऱ्यावर सोडून देणाऱ्यांपैकी मी नाही’ असेही म्हटले होते. परंतु संवेदनशील मुख्यमंत्र्यांचे शब्द दुर्दैवाने आजपर्यंत कृतीमध्ये उतरलेले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
कृषी आयुक्तांकडून विमा कंपन्यांना पीकविमा देण्याबाबत एक पत्र गेले हे खरे आहे, मात्र साध्या पत्रावर खाजगी विमा कंपनी ३००-४०० कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत करतील ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात खरिपाच्या पीक विम्यातून कंपनीने रु.५५० कोटी नफा कमावला आहे. विमा कंपन्यांची बैठक बोलवा, आम्हालाही त्यात सहभागी करा हे अनेक वेळेस सांगून झाले. परंतु आजपर्यंत साधी बैठक लावली गेली नाही यातच सरकारचे गांभीर्य दिसते. नुकसान झाले होते हे सरकारला मान्य आहे, विमा कंपन्यांना नुकसान देण्याबाबत पत्र दिले, पत्राला या कंपन्या जुमानत नाहीत मग सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यापेक्षा चीड येण्याची बाब म्हणजे महाविकास आघाडीचे स्थानिक लोकप्रतिनिधी या विषयावर तोंड उघडायला तयार नाहीत. आता जनतेनेच त्यांना काय केल्यावर पीक विमा प्रश्नी तुम्ही तोंड उघडणार हा जाब विचारण्याची वेळ आली आहे, असे मत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सोशल मिडियाच्या माध्यामातून व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांनी ठाकरेंना सल्ला द्यावा; ८ दिवस कोकणात जाऊन आपल्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत’
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार ‘उभारी’!
- उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर उस्मानाबादेत कारवाई
- बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय होणार ? केंद्र सरकारची महत्वाची बैठक
- औरंगाबादेत तरुण वर्गच सुपर स्प्रेडर, बाधितांमध्ये ‘एवढ्या’ तरुणांचा समावेश!


