मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक पार पडली आहे. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. लॉकडाऊनबाबत काय निर्णय होणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असून टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी १४ दिवसाच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे मत वर्तवले आहे.
दरम्यान, ही बैठक संपली असून उद्धव ठाकरेंनी तज्ज्ञांची मतं जाणून घेऊन काही शंकांचे निरसन देखील करून घेतले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी या बैठकीनंतर दिली आहे. १४ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे जनतेमध्ये उद्रेक होईल असा सूर देखील या बैठकीत उमटला असून ८ दिवसांच्या लॉकडाऊनचा देखील पर्याय आहे.
दुसरीकडे, लॉकडाऊन करण्याआधी किमान तीन दिवस आधी कल्पना द्यावी अशी मागणी आता काँग्रेससह शिवसेनेतील नेते देखील करत आहेत. लॉकडाऊन करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकांचं सत्र सुरु असून रात्री साडेआठ वाजता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक आहे. यावेळी काही प्रशासकीय अधिकारी देखील सोबत हजर असतील. ही बैठक वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडेल. दरम्यान, या बैठकीत काय चर्चा होणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रेक दि चेनचा पहिला बळी! उस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- खासदार छत्रपती संभाजी म्हणतात, नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना सूट तर मोडणाऱ्यांवर कारवाई करा
- ‘नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार’
- भाजप आ.सुरेश धस यांच्या मागणीची महाविकास आघाडीकडून दखल


