🕒 1 min read
मुंबई: शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली होती. शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला होता. अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूनीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर होण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत.
यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या भेटीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. ‘शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे’, अस नवाब मलिक यांनी सांगितलं. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने देखील भाजप वर संधान साधले आहे.
‘शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये गुप्त खलबते झाल्याच्या अफवेने दोनेक दिवस चर्चा तर होणारच. श्री. पवार हे शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथे खास विमानाने गेले. त्यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल होते. एका बडय़ा उद्योगपतीच्या घरी ते मुक्कामाला होते. हे बडे उद्योगपती कोण हेसुद्धा उघड आहे. त्याच रात्री अमित शहा अहमदाबाद येथे पोहोचले व शहा-पवारांत देशभरात गाजत असलेली गुप्त भेट झाली. त्या गुप्त भेटीत म्हणे गुप्त खलबतेही झाली. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. अहमदाबादेत भेट झाली म्हणजे दोन नेत्यांचे राज्यातील सरकारबाबत काय ते नक्कीच ठरले असणार व ठाकरे यांचे सरकार दोन दिवसांत गेलेच म्हणून समजा, असा दावा काही लोकांनी केला. मुळात सत्य असे आहे की, अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट, गुप्त खलबते झाल्याचा साफ इन्कार पवारांकडून करण्यात आला.
शरद पवार यांच्याभोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण करायचे व गुळाची ढेप वितळवून टाकायची, असे भाजपचे षड्यंत्र असेल तर ते मूर्खांच्याच नंदनवनात फिरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार उत्तम गतीने व नीतीने चालले आहे. लहान सहान वावटळी येतात आणि जातात. त्या वावटळीने झाडाची पानेही गळत नाहीत. इतके झाडाचे बुंधे आणि मुळे मजबूत आहेत. फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत. अशी टीका शिवसेनेने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

