🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोखच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच यावेळी त्यांनी भक्ती, अंधभक्ती किंवा चमचेगिरी म्हणजे काय? याविषयी एक कथाही सांगितली आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, नवाबाचे जेवण भक्ती, अंधभक्ती किंवा चमचेगिरी म्हणजे काय, याची चांगली कथा आचार्य रजनीश यांनी सांगितली. हर्ष गोयंका यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ती पुन्हा प्रसिद्ध केली. मुल्ला नसरुद्दीन हा नवाबाचा लाडका होता. अर्थात, सगळ्यात मोठा चमचा होता. चमच्यांवर कोण प्रेम करत नाही? सगळेच करतात. एकदा नवाब आणि नसरुद्दीन दोघेच जेवायला बसले. भेंडीची भाजी बनवली होती. भेंडीचे ताजे ताजे पीक बाजारात आले होते. नवाबाला भेंड्याची भाजी आवडली. नवाब म्हणाला, ”भेंड्याची भाजी खरंच चविष्ट झालीय. चव जिभेवर रेंगाळतेय.” मग नसरुद्दीन कसा मागे राहील? चमचे तर अशा संधीच्याच शोधात असतात. नसरुद्दीन म्हणाला, ”फक्त सुंदर आणि स्वादिष्ट? वनस्पती शास्त्रानुसार हे तर अमृत आहे. जे भेंड्याची भाजी खातात ते एक हजार वर्षे जगतात आणि त्यांचा एक एक दिवस हजार वर्षांचा असतो. भेंडी ही साधी गोष्ट नाही. जसे आपण सम्राटांचे सम्राट, तशी भेंडीसुद्धा भाज्यांची सम्राट.”
आतमध्ये आचाऱ्याने हे ऐकले. त्याला प्रेरणा मिळाली. जर भेंडीत अमृताचे गुण आहेत तर त्याने दुसऱ्या दिवशीही भेंडी बनवली. तिसऱ्या दिवशीही भेंडीच भेंडीच बनवली. पुढे तो हे भेंडीचे अमृत रोजच नवाबाच्या चांदीच्या ताटात वाढू लागला. आठव्या दिवशी नवाबाने जेवणाची थाळी फेकली. नवाब संतापला, ”भेंडी, भेंडी, भेंडी! काय चाललंय? मारणार आहात का तुम्ही मला?” त्यावर नसरुद्दीनने त्याची थाळी आणखी जोरात फेकली! आणि उठून एक जोरात थप्पड लगावली त्या आचाऱ्यास. ”तू नवाबाला मारायला निघालास? दुष्ट कुठला! भेंडीसारखी बेचव, सडकी भाजी नवाबाला खायला घालताना लाज नाही वाटत? भिखारीसुद्धा भेंडी खात नाहीत. नाव फक्त भेंडी. हे विष आहे विष! तू दुश्मनांच्या हातातले बाहुले बनला आहेस. तू षड्यंत्राचा भागीदार आहेस. तू देशविरोधी कारस्थानाचा सूत्रधार आहेस. नवाबाला भेंडी खायला घालून तुम्ही नवाबाच्या आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी खेळ करीत आहात.” नसरुद्दीनचा हा अवतार बघून नवाबही आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, ”नसरुद्दीन हे काय? आठ दिवसांपूर्वी तूच तर म्हणाला होतास भेंडी म्हणजे अमृत आहे. विसरलास तू?” नसरुद्दीन म्हणाला, ”शेटजी, कसा विसरेन? मला आठवतंय सगळं.”
नवाब म्हणाला, ”आज अमृताचं जहर कसं काय झालं? भेंडी तर तीच आहे. तू का बदललास? आणि त्या बिचाऱ्या आचाऱ्यालाही तू मारलंस. आणि तू जेवणाची थाळी माझ्यापेक्षा जोरात फेकलीस.” नसरुद्दीन शांतपणे म्हणाला, ”शेठजी, आम्ही काही त्या भेंडीचे नोकर नाहीत. आम्ही तर तुमचे नोकर आहोत. भेंडीची ऐशी की तैशी. भेंडी गेली भाड में! तुम्हाला भेंडी आवडली नाही, मग आम्हालाही आवडली नाही. तुम्ही थाळी फेकलीत, मग आम्हीही आमची थाळी जोरात फेकली. तुम्हाला भेंडी आवडली तेव्हा आम्हाला आवडली. आम्ही आपले नोकर आहोत शेठजी! समजून घ्या!”
दरम्यान, चमचे आणि भक्तांचे किती समर्पक वर्णन केले आहे पाहा. मोदींना खिचडी आवडते म्हणून भक्तांनाही खिचडी आवडू लागली. मोदींनी चहा विकला म्हणून भक्तांनी चहाची विक्री सुरू केली. या भक्तीस तोड नाही. आता तर कोथरुडचे पाटील मोदींच्या झोपेवर संशोधन करायला निघाले. मोदी यापुढे 24 तास जागे राहतील. म्हणजे त्यांचे भक्तही झोपणार नाहीत, असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- चमच्यांचे ‘हे’ विधान ऐकून मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल- संजय राऊत
- “मालिक तो महान है, बस चमचो से परेशान हैं”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- IPL 2022 : पहिल्या सामन्यातील पहिला बॉलच नो बॉल ; तर ऋतुराज डकवर परतला
- IPL 2022: १५व्या हंगामातील पहिला टॉस श्रेयसने जिंकला; वाचा दोन्ही संघात कोण खेळणार!
- पुणे सुपरजायंट्सच्या माजी कोचचा धोनीबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाला होता “मला सल्ले…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
