🕒 1 min read
मुंबई- राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा घेण्याचे संकेत दिले होते. सरकार व राज्यपालांच्या भूमिकेतील विरोधाभासामुळे राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार की घेतल्या जाणार याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देखील या वादात उडी घेतली. पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला तर देशातील नामांकित विद्यापीठे, तसेच जगातील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खाजगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील तर शासनाने घेतलेला निर्णय त्यात अगदीच चुकीचं कोणी केलं आहे असं होत नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते, असा टोला शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.
दरम्यान, आता भाजप नेते आशिष शेलार यांनी आज फेसबुक पोस्ट मधून सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या पोस्टमध्ये शेलार म्हणतात, ‘सर्वज्ञानी’ राज्य सरकार ऐका! तुम्ही ‘सरासरी’ वागलात तरी तरुणांचे आयुष्य ‘सरासरी’ उध्वस्त होऊ देणार नाही! मुंबई विद्यापीठात अंतिम वर्षाला 2 लाख 3 हजार 700 विद्यार्थी असून त्यातील 73 हजार एटीकेटी असलेल्या 35.83%विद्यार्थ्यांना नापास करुन त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या 2 लाख 25 हजार 124 विद्यार्थ्यांपैकी 43.41% म्हणजे 1लाख विद्यार्थी एटीकेटीचे,तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 70 हजार 234 पैकी एटीकेटी असलेले 35 हजार म्हणजे 49.83%विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल!
गोडवांना विद्यापीठात 24हजार विद्यार्थी असून त्यातील 16हजार म्हणजे 66.66% एटीकेटी असलेले तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 70हजार विद्यार्थ्यांपैकी 30% म्हणजे 21हजार एटीकेटी असलेले विद्यार्थी आहेत. ‘सरासरी’ नापास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल!
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात अंतीम वर्षाला 73हजार 506 विद्यार्थ्यांपैकी 42%म्हणजे 30हजार 828 विद्यार्थी एटीकेटी असलेले तर सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात 38हजार विद्यार्थ्यांपैकी 50%म्हणजे 19 हजार एटीकेटी असलेल्यांना नापास करणार तर संघर्ष करावाच लागेल!
औरंगाबादच्या डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 हजार 521 विद्यार्थ्यांपैकी 12.46% म्हणजे 9 हजार161 एटीकेटी असलेल्यांना, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात 35 हजार 500 पैकी 42.25% म्हणजे 15 हजार एटीकेटी असलेल्यांना नापास कराल तर संघर्ष करावाच लागेल.
जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 46 हजार 466 विद्यार्थ्यांपैकी 38.34% म्हणजे 17 हजार 819 विद्यार्थी एटीकेटी असलेले, तर एसएनडीटी मध्ये 14 हजार 839 विद्यार्थ्यींनीपैकी 30.32% म्हणजे 4 हजार 500 एटीकेटी असलेल्यांना नापास करणार तर संघर्ष करावाच लागेल!
11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी 8 लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 म्हणजे 40% विद्यार्थी नापास करणार? म्हणजे एक पिढी उध्वस्त करणार! ‘सर्वज्ञानी’ राज्य सरकार ऐका! महाराष्ट्रातील या 40% विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल!
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या परीक्षांच्या बाबतीत पवारांनी केलेला दावा खोटा ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
