अहमदनगर:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल केला.
जगभरातून या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. कालच्या लाजिरवाण्या घटनेमुळे भारताची मान शरमेने झुकली असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी असं आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांनी केल आहे.
दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यथित झाले आहेत. ‘प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी हे फारच दुर्दैवी आहे,’ अशी प्रतिक्रिया हजारे यांनी व्यक्त केली आहे.
‘काल दिल्लीत जे घडलं ते नक्कीच क्लेशदायक आहे. काल प्रजासत्ताक दिन होता. आजच्या दिवशी प्रजेची सत्ता आली. प्रजा मालक झाली. अन् अशा पवित्र दिवशी आपणच धूडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करावे हे फारच दुर्दैवी आहे. मी चाळीस वर्षे आंदोलन करीत आहे. आंदोलन म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह हा शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने करावा लागतो. हिंसेमुळे आंदोलन बदनाम होते. गालबोट लागते, असेही हजारे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच’ चिघळलेल्या आंदोलनावर बॉलिवूड लेखकाचं ट्वीट
- ‘महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन, अरे कुठे फेडाल ही पापं?’
- ‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – अजित पवार
- जनतेशी मनमोकळा संवाद साधताना धनंजय मुंडे झाले भावूक
- ‘रोज वचवच करणारे संजय राऊत दिल्ली घटनेवर का बोलले नाहीत?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

