जेऊर : करमाळा तालुक्यातील लसीकरणाचा वेग वाढवा, हक्काचा लस कोटा मिळवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे स्वतः पाठपुरावा करा, अशी सुचना माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा पंचायत समिती पदाधिकारी व जि. प सदस्यांना केली. सोलापुर जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ही कासवगतीने चालू असुन केवळ 14 टक्के नागरिकांचेच लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले.करमाळा तालूक्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांनी आता हाती असलेल्या पंचायत समिती व जि. प या सत्तास्थानांचा वापर करत लसीकरण मोहीम वेग वाढवण्यासाठी अंग झटकुन कामाला लागण्याची सुचना पदाधिकाऱ्यांना दिली.
याबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, करमाळा शहर व तालूक्यात कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णांची संख्या इतर तालूक्यांपेक्षा जास्त होती. सहाजिकच संभाव्य तिसरी लाट नजरेसमोर गृहीत धरली तर वेळेत तालुक्यातील 45 वर्षावरील नागरिक व नंतर 18 ते 45 वर्षा दरम्यान असलेले नागरिक यांचेही लसीकरण होणे गरजेचे आहे. सध्याचा वेग खुप कमी असुन लस उपलब्धता नाही. विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी करमाळा तालूक्यास लस मिळवून देण्यात आपण कमी पडल्याचे मागेच स्पष्ट केले असल्याने आता त्यांचेवर अवलंबून न राहता पंचायत समिती व जिल्हा परिषदेने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
पाटील म्हणाले, सोलापुर जिल्ह्यातील शहर व सर्व तालूक्यांसाठी राज्यशासनाकडून नुकतेच 18 हजार 400 लसींचा पुरवठा करण्यात आल्याचे वृत्त असून सर्व तालूक्यांना समान न्याय देत व करमाळा तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णसंख्या पाहता या तालूक्यास प्राधान्याने लसकोटा देण्यात यावा. सध्या 3 ते 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावांना आठवड्यास केवळ दहा लस दिल्या जातात.संबंधित गावात या दुसऱ्या टप्प्यात 50 ते 100 रुग्ण कोरोना बाधित आढळून आलेले असतानाही ही लस उपलब्धता खुपच कमी जाणवते.
जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचे नेतृत्वाखाली करमाळा पंचायत समितीच्या पदाधिकारी व जि. प सदस्य शिष्टमंडळाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तातडीने वाढीव लस कोट्याबाबत मागणी करावी, अशी सुचना आपण पदाधिकाऱ्यांना दिली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तसेच तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता नजरेसमोर ठेऊन लहान मुलांसाठी कोविड प्रतिबंधक उपाययोजना व औषधे याबाबतही नियोजन करण्यात यावे अशी मागणी आपण जिल्हाधिकारी यांचेकडे करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’
- २० वर्षांनी थिरकले गोविंदा- नीलम `या` गाण्यावर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


