मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना वाद गेले काही दिवसात प्रचंड टोकाला गेलेला दिसून आला. यानंतर, महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करत तोडकाम केले. तर, ही कारवाई कंगनाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस व व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप कंगना समर्थकांनी केला होता.
शिवसेना आणि कंगना रणौत वाद विकोपाला गेला असतानाच भाजप, रिपाइंने मात्र कंगनाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून या टीकाकरांवर निशाणा साधण्यात आला आहे. कंगनाला दुश्मन म्हणत तिचा जयजयकार करणाऱ्यांना सुनावले आहे. तसेच, बाळासाहेबांनी दिलेला स्वाभिमानाचा निखारा अजूनही पेटत असून त्या निखाऱ्यार राख साचली आहे , असे कोणाला वाटत असल्यास एक फुंकर मारून पहावे! असे आव्हान देखील दिले आहे.
सामना अग्रलेख :
लढ्याच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून मुंबई महाराष्ट्राच्या हाती पडली. याचे भान महाराष्ट्र दुश्मनांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱयांनी ठेवलेच पाहिजे. महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत. औरंगजेबाचे थडगे संभाजीनगरात आणि अफझलखानाची कबरही सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा विशाल हृदयाचा महाराष्ट्र आहे. त्या विशाल हृदयाच्या महाराष्ट्राच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे!
मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळय़ा वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे. प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्र्ाहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्रहरण सुरू असताना घडलेले दिसत होते.
शिवसेनाप्रमुख नेहमीच जाहीरपणे सांगत, देश एक आहे, अखंड आहे. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो.
ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला? आम्हाला एकात्मता कोणी शिकवू नये. महाराष्ट्रातच राष्ट्र आहे व महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे आमच्या सेनापती बापटांनी सांगूनच ठेवले आहे. पण वाद उकरला जातो तो मुंबईच्या बाबतीत. त्यात एक राजकीय पोटदुखी आहेच.
महत्वाच्या बातम्या:-
आता दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तानसोबत टक्केवारी? आशिष शेलरांची शिवसेनेवर बोचरी टीका!
अभिनेता कुशल बद्रिकेने मांडली ठाणेकरांची व्यथा, महापालिकेकडे हि विनंती
माजी अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

