नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याने महाराष्ट्रातील अमरावती येथे केलेले भाषण अयोग्य आणि घृणास्पद होते. परंतु त्यामुळे ते दहशतवादी कृत्य ठरत नाही. दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याच्या आरोपाखाली दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या खालिदने दिलेल्या भाषणातील तथ्ये तपासल्यानंतर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे. खालिदच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, दिल्ली पोलिसांचे प्रकरण हे भाषण किती आक्षेपार्ह होते यावर आधारित असेल तर तो गुन्हा ठरणार नाही. इतकेच नाही तर खंडपीठाने खालिदचे भाषण ‘आपत्तीजनक’ आणि ‘आक्षेपार्ह’ होते आणि ते मानहानीचे ठरू शकते. परंतु ते दहशतवादी कृत्य ठरणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.
ज्येष्ठ वकील त्रिदीप पैस यांनी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने ही टिप्पणी केली. दिल्ली हिंसाचाराच्या कटात खालिदचा सहभाग असल्याबद्दल दिल्ली पोलीस त्याच्या अमरावतीमध्ये 17 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या भाषणाचा आधार घेत आहेत.
तसेच देशद्रोह प्रकरणात न्यायालयाने आरोपी शरजील इमामच्या जामीन अर्जावर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. 27 मे रोजी देशद्रोहाच्या प्रकरणात शरजील इमामच्या वतीने जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पोलिसांना उत्तर दाखल करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :


