टीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषद घेवून सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टोलेबाजी केली आहे. यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, राष्ट्राला भगवं, पिवळं, हिरवं किंवा पांढरं करा , पण राष्ट्रात रोजगाराचं काही तरी पाहा असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी सरकारला फटकारले आहे. तसेच देशात याआधी लोकशाही होती त्यामुळे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य होते पण आता ईडी, आयबीचा धाक दाखवून मत व्यक्त करण्याची मुभा काढून घेतली आहे. असा टोला देखील उदयनराजे भोसले यांनी यावेळी लगावला आहे.
यावेळी भोसले म्हणाले की, या सरकारच्या काळात ज्यांचं पोट तळहातावर होतं, त्यांचा रोजगार बंद झाला आहे. पाच वर्षांपूर्वी काही कमी जास्त असेल पण किमान त्यावेळी लोकांकडे रोजगार देखील होता. पण आता या लोकांना तुम्ही रोजगार कसा देणार असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला आहे. तसेच उदयनराजे पुढे म्हणाले की, सगळ विस्कळीत झालं असून आगामी काळात बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांपूर्वी जगात मंदीची लाट आली होती पण भारताला याचा झळ बसली नव्हती, याची आठवण देखील यावेळी उदयनराजे यांनी करून दिली.
दरम्यान वर्धा येथील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि कुटुंबीयांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते.त्यावर उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार त्यांच ते पाहून घेतील मात्र २०१४ मध्ये जनतेने भाजपला बहुमत दिले होते, त्यामुळे तुम्ही काय केलं हे दाखवून द्या.असा टोला उदयनराजेंनी यावेळी लगावला आहे. लोकांना दिलेले वचन पाळले की नाही, देशाची स्थिती काय आहे, ते तर सांगा. त्यानंतर लोकं ठरवतील तुम्हाला स्वीकारायचं की नाकारायचं, असं उदयनराजे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

