औरंगाबादः महाराष्ट्र राज्याचे पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) शहरात एका कार्यक्रमानिमित्त येत आहेत. ते अजिंठा आणि वेरुळ लेण्यांना भेट द्यायला येणार असल्याचे समजते. खुद्द मंत्री अजिंठा आणि वेरुळला भेट देत आहेत ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे आमचे दुःख किंचीत का होईना ते समजू शकतील. या दौऱ्यात आम्हाला प्रत्यक्ष भेटून आमचे म्हणणे ऐकूण घेतल्यास आम्हाला अधिक आनंद होईल, असे मत पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिकांनी सांगितले की, येत्या मार्चमध्ये लॉकडाऊनला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात जवळपास पर्यटन व पर्यटनावर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय बंद असून त्यावर अवलंबून असलेली कुटुंबांची आर्थिक होरपळ होत आहे. यात प्रामुख्याने छोटे व्यावसायिक, बस, टॅक्सी, हॉटेल, गाईड आणि टूर ऑपरेटर्सचा समावेश आहे. पर्यटन उद्योगावर औरंगाबादमधील २५ हजारांहून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. पर्यटन वगळता इतर सर्व उद्योग व व्यवसायांना कोविड अटी व शर्थींसह सुरु आहेत.
एकट्या पर्यटन उद्योगाला सरकारकडून सावत्र वागणूक दिली जात आहे. कोविडचे सर्व नियम व अटी पाळून पर्यटन उद्योगाला चालना देणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांत बहुतांश लहान-मोठे सर्व पर्यटन व्यवसायिक संपत आले आहेत किंवा संपले आहेत. अद्यापही वेळ गेलेली नसून इथून पुढे पर्यटन स्थळे व पर्यटन बंद न करता नियम व अटींसह सुरु करण्याची तात्काळ परवानगी देण्यात यावी, ही प्रमुख मागणी आहे व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
त्यासह मागील दोन वर्षांत पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना सोबत न घेता फक्त आदेश निघतात. पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिकांचे म्हणणे कधीही ऐकूण घेतले जात नाही. इथून पुढे कोणताही आदेश जारी करण्यापूर्वी किमान या क्षेत्रातील व्यावसायिकांशी चर्चा करावी, ज्यामुळे व्यवसायिक व सरकार यांच्यात ताळमेळ साधला जाईल. अशी अपेक्षा औरंगाबाद टुरिज्म डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, सुनीत कोठारी, अजिंठा हस्तकला व शॉपकीपर असोसिएशनचे उपेंद्रपालसिंग वायटी आणि गाईड असोसिएशनचे उमेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर केशव उपाध्येंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “कोण चौथ्या नंबर ला…”
तुमचं लग्न कधी होणार? म्हणाऱ्या नेटकऱ्यांना सोनाक्षीने दिलं ‘हे’ उत्तर
‘…यांची मानसिक स्थिती अत्यंत खालावली आहे’; कॉंग्रेसची किरीट सोमय्यांवर टीका


