मुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते. कोरोना काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते,’ असे उद्गार यावेळी मोदींनी काढले आहेत. यावरून विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे. तर यावरून आजच्या सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
‘प. बंगालात निवडणुकांचे रण पेटले असतानाच पंतप्रधान मोदी हे बाजूच्याच बांगलादेशच्या दौऱ्यावर जाऊन आले. मागे उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा ज्वर चढला असताना मोदी नेपाळ दौऱ्यावर गेले. तेथे पशुपतिनाथ मंदिरात जाऊन दिवसभर पूजाअर्चा करीत होते, गाईला चारापाणी घालत होते. हे सर्व हिंदुस्थानातील वृत्तवाहिन्या सतत दाखवत होत्या. बांगलादेशमध्येही मोदी हे तेथील जशोरेश्वरी कालिमाता मंदिरात जाऊन बसले. त्यांनी पूजाअर्चा केली. हे चित्र प. बंगालातल्या हिंदू मतदारांना प्रभावित करण्यासाठीच असावे.
इंदिरा गांधींनी युद्ध करून पाकिस्तान तोडले व बांगलादेश निर्माण केला, यापेक्षा बांगलादेश निर्मितीसाठी मोदी यांनी सत्याग्रह केला हे शौर्य महत्त्वाचे असे भाजप कार्यकर्त्यांना वाटू शकते. ”बांगलादेशमधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांमुळे आम्ही व्यथित झालो होतो. या अत्याचारांची छायाचित्रे पाहून अनेक दिवस झोपही लागली नव्हती,” असे मोदी यांनी ढाक्यात सांगितले. पंतप्रधान हे कमालीचे हळवे, दयाळू व संवेदनशील असल्याचे हे लक्षण आहे. असा खोचक टोला यावेळी शिवसेनेने लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीयदृष्टय़ा कमालीचे जागरुक असलेले मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील’
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील शरद पवारांची फोनद्वारे विचारपूस !
- ‘मोदींचा दौरा संपल्यावर धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या, बांगलादेश दौऱ्याचे हे फलित आहे’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?


