🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने सर्व स्तराहून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच अजूनही या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या विषयाकडे पोटतिडकीने पाहायला हवे. महाराष्ट्र सरकार तरी याप्रश्नी नक्की काय करते आहे? बेळगावच्या तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व येथील सरकारने अंग चोरून बसायचे, हे बरे नाही. बेळगावातील ३८ तरुणांच्या लढय़ाने, त्यागाने रायगडास नक्कीच जाग आली असेल. पण रायगडाच्या पायथ्याशी बसलेल्या मऱ्हाटी, शिवप्रेमी सरकारचे मन द्रवेल काय?महाराष्ट्र सरकार तरी याप्रश्नी नक्की काय करते आहे?’. पुढे ते म्हणाले, कर्नाटकात भाजपचे शासन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपवाले त्या दडपशाहीवर ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. हे सर्व प्रकरण अद्याप विझलेले नाही, तर त्यात तेल ओतण्याचे काम कर्नाटकचे बोम्मई सरकार करत आहे. १६ डिसेंबरला बंगळुरूत छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना अज्ञात समाजकंटकांनी केली. हे अज्ञात समाजकंटक म्हणजे कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे गावगुंड होते. त्या घटनेचे पडसाद उमटायचे ते उमटलेच. सीमा भागातील मराठी जनतेने शिवराय पुतळा विटंबनेचा रस्त्यावर येऊन निषेध केला. हा लोकांचा संताप आणि चिड होती.
बंगळुरू येथील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कारवाई करावी याच मागणीसाठी ही मऱ्हाटी पोरे रस्त्यावर उतरली. तेव्हा त्यांना कानडी पोलिसांनी बेदम मारहाण करून तुरुंगात पाठवले. आजपर्यंत त्यांना जामीन तर मिळू दिलेला नाहीच, पण या ३८ पोरांवर आज राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमचेच सडविण्याचा अघोरी प्रकार सुरू झाला आहे. या अतिरेकास काय म्हणायचे, ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच स्पष्ट करावे. शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला, हा काय देशद्रोहासारखा अपराध झाला?, असा सवालही राऊतांनी केला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’शिवरायांचा कर्नाटकात अपमान झाला त्याचे पडसाद महाराष्ट्रातही विविध ठिकाणी उमटले. म्हणून या सर्व लोकांवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले नाहीत. कारण महाराष्ट्राचे शिवराय प्रेम बावनकशी आहे, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते राज्यातील मऱ्हाटी रक्ताच्या भाजप पुढाऱ्यांचे. त्यांची बेळगावसह सीमा भागाविषयीची भूमिका ही बुळबुळीत आहे. ती गुळगुळीत असती तरी एकवेळ निभावले असते, पण सीमा भाग महाराष्ट्रात यावा म्हणून जे २० लाख मराठी बांधव लढत आहेत, मरत आहेत त्यांचे पाय खेचण्याचेच उद्योग महाराष्ट्रात बसून हे लोक करीत आहेत. सीमा भागातील अत्याचाराविरोधात हे लोक कधी साधा कागदी निषेध करत नाहीत. पण इतर प्रकरणी नुसता थयथयाट करतात,’ असेही लेखाच्या शेवटी राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती’
- राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु; जाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध
- “…अशी शैली माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती”; शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक
- यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित
- पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
