लातूर- मांजरा नदी वरील शिवणी बॅरेजचा स्वंयचलीत दरवाजा अचानक उघडला गेल्याने पाणी वाहून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
यावर्षी समाधानकारक पाऊस होत असल्याने लातूर जिल्हयातील जवळपास सर्वच पाटबंधारे प्रकल्पात चांगला पाणीसाठा होत आहे. मांजरा, तावरजा, तेरणा, रेणा या नदया वरील सर्वच बॅरेजमध्ये आता पाणी थांबले आहे. मंगळवारी रात्री जिल्हयात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून नदी पात्रातील पाण्यात वाढ झाली आहे. दरम्यान मांजरा नदीवरील शिवणी बॅरेजचा स्वंयचलीत दरवाजा अचानक उघडला गेल्याने मोठया प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. हा प्रकार धक्कादायक असुन यातुन मोठा धोकाही उदभवण्याची शक्यता होती.
सदरील घटने संबंधी माहिती मिळताच औरंगाबाद-जालना दौऱ्यावर असलेले पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी तातडीने लातूर जिल्हाअधिकारी यांच्याशी संपर्क साधून या संबंधी सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पाण्याची नेहमीच अडचण भासणाऱ्या लातूर जिल्हयात यावर्षी समाधानकारक पावसामुळे उपलब्ध झालेले पाणी काळजीपूर्वक अडवण्याचे व जपून ठेवण्याचे निर्देश यापुर्वी झालेल्या आढावा बैठकीत दिलेले असतांना पाणी वाहून जाण्याचा प्रकार गंभीर असल्याचे पालकमंत्री यांनी म्हटले आहे.
कोणत्याही स्थितीत अशा प्रकारची चूक खपवून घेतली जाणार नाही. जलसंपदा विभागाच्या दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणामूळे हा प्रकार घडला असल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. आगामी काळात असा प्रकार कोठेही घडणार नाही याची गंभीरपणे काळजी घ्यावी असेही पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द
- जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
- पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
- मेट्रो कारशेडचं पितळ उघड केल्याच्या पोटशूळातूनच जनसहभागाच्या योजनेवर अविश्वास
- कैदेतून सुटका होताच मेहबुबा मुफ्ती यांनी ओकली पुन्हा गरळ,म्हणाल्या…


