औरंगाबाद : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालसंगोपनन (एमसीएच विंग) विभाग उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र शासनाने घाटीतील एमसीएच विंग रद्द करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (दि. २७) मंत्रालयात अमित देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत २०१८-१९ मध्ये २०० खाटांचे स्वतंत्र माता व बालसंगोपनन (एमसीएच विंग) विभाग उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. परंतु अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी २८ मार्च २०२० रोजी पत्राद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठांताना घाटीसाठी प्रस्तावित असेलेले एमसीएच विंग रद्द करून त्याऐवजी औरंगाबाद जिल्ह्याकरिता २०० खाटाचे महिला व नवजात शिशू रूग्णालय बांधण्याकरीता केंद्र शासनाकडे प्रस्ताव मान्यतेस्तव सादर केल्याचे म्हटले होते.
त्यामुळे घाटीसाठी प्रस्तावित असलेल्या एमसीएच विंगचे बांधकाम रद्द समजण्यात यावे असे देखील पत्रात नमूद केले होते. घाटी रूग्णालयात मराठवाडा त्याच बरोबर विदर्भ, खान्देशातील अनेक जिल्ह्यातील गोरगरीब रूग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे घाटीतील एमसीएच विंग झाल्यास गोरगरीब रूग्णांना याचा फायदा होण्यास मदत होईल असे चव्हाण यांनी अमित देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या एमसीएच विंगसाठी घाटी रूग्णालयाच्या परिसरात जागा उपलब्ध आहे.
बांधकामासाठी जागेची पाहणी देखील झालेली आहे. तसेच एमसीएच विंग चालविण्याकरिता आवश्यक असलेले तज्ञ डॉक्टर घाटी प्रशासनाकडे उपलब्ध असल्याचे देखील आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे एमसीएच विंग रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. अमित देशमुख यांनी यासंदर्भात पुनर्विचार होण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री अनिल पटेल, प्रकाश मुगदिया यांची देखील उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला नदीजोड प्रकल्प राबविण्याची गरज’
- भावी डॉक्टरांच्या वस्तीगृहात शिरले पावसाचे पाणी, विद्यार्थ्यांसमोर समस्यांचा पूर!
- …अन् देवेंद्र फडणवीस, दरेकर बसले दरडग्रस्तांच्या पंगतीत; मृतांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
- प्रभू रामचंद्रांनी समुद्रावर सेतू बांधला, आरामचंद्र भिंत बांधतायत- अतुल भातखळकर
- चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा


