🕒 1 min read
औरंगाबाद : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची तसेच शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही, आणि ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदती पैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला आहे.
आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार आहे. मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरा देखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री आणि वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे ते म्हणाले.
गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या २८ लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे. शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या ९७३ कोटींच्या रकमेपैकी शेतकऱ्याच्या हातात फुटकी कवडी देखील पडलेली नाही, याची सरकारला शरम वाटत नाही का, असा सवालही त्यांनी केला. या वेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथ जाधव, जिल्हा संघटन सरचिटणिस लक्ष्मण औटे, आ. प्रशांत बंब, डॉ.राम बुधवंत आदि पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर शंका उपस्थित केली तर कायदा व्यवस्थेला धोका आहे’
- …तर आम्ही या परिस्थितीत कामच करू शकत नाही- सरन्यायाधीश एन. व्ही. रमण
- इम्तियाज जलील काहीही बोलतो, आम्ही या शहराचे ‘संभाजीनगर’ करणारच; चंद्रकांत खैरेंचा पलटवार
- ‘संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली’, नारायण राणेंचा टोला
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

