🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढच्या वेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असं विधान केले होते. यानंतर आता संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री पदाबाबद मोठं विधान केले आहे. उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी टीका केली आहे.
गजानन काळे म्हणाले, “संजय राऊत म्हणतात पुढची 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार, तर दुसरीकडे काल परवा तुळजाभवानीला जाऊन सुप्रिया ताई म्हणतात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होउदे मी नवस फेडायला येईल. राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री नकोय असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं आहे. पुढच्या काही दिवसात सुप्रिया ताई या पहिल्या मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होतायत की काय? असं चित्र शिसैनिकांनी पाहणं एवढंच राहिलं आहे. शिवसैनिकांनो काळजी घ्या आणि या लाचार संजय राऊतांना योग्य वेळी आवरा”.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन”.
यावर संजय राऊत काय म्हणाले ?
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानावर संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
