कोल्हापूर – २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ED नं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात आज ईडीनं मोठी कारवाई करत साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता, इमारत आणि जमीन जप्त केली आहे. सगळी जवळपास ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे.
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर आता राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य करत इतर ४३ कारखान्यांबाबत देखील अशीच कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यासोबतच, सर्वपक्षीय नेत्यांनी साखर कारखाने लुटल्याचा आरोप देखील शेट्टी यांनी केला आहे.
‘गेल्या पाच वर्षांपासून ईडी झोपली होती का? मी कोणालाही सर्टिफिकेट द्यायला आलो नाही. मात्र, जरंडेश्वर साखर कारखान्यावर राजकीय हेतूनेच कारवाई केली जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पत्रानंतर ही कारवाई झाली. चंद्रकांतदादा हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत. आता त्यांनी इतर कारखाना संदर्भातही अशीच पत्रे लिहावीत,’ असं राजू शेट्टी म्हणाले.
यासोबतच, ‘केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. 43 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे. कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकला आहे. ईडीकडे 5 वर्षे फेऱ्या मारल्या. 43 कारखान्यांची यादी हवी असेल तर पुन्हा देतो,’ असं देखील राजू शेट्टी म्हणाले आहेत.
दरम्यान, शेट्टी यांनी केलेली मागणी मान्य झाल्यास शेकडो एकर जमिनीवर डोळा ठेवत बंद पडलेले किंवा पाडलेले साखर कारखाने कवडीमोल दराने विकत घेणाऱ्या सर्वपक्षीय साखरसम्राटांच्या पायाखालची वाळू सरकू शकते. सहकारात बंद पडलेला कारखाना खासगी झाल्यावर चमत्कार झाल्यासारखा व्यवस्थित सुरू कसा होतो या प्रश्नांचे उत्तर देखील ईडीने व्यवस्थित तपास केल्यावर मिळू शकते. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांसह अन्य पक्षातील काही नेत्यांनी सरकार व शेतकऱ्यांची फसवणूक करत कोट्यवधीचा मलिदा लाटला आहे. या नेत्यांनी सरकारचा मोठा महसूल बुडवला आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच आनंद होईल अशी स्थिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर भाजपने ‘ईडी’, ‘सीबीआय’चे वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणेच बाकी आहे’
- डिजिटल पेमेंटसाठी Paytm देतेय ५० कोटींची ऑफर
- ‘ओबीसी समाजाचे नेते आरक्षणासाठी एकत्र येतात मग मराठा समाजाचे नेते का येत नाहीत?’
- पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढला, ‘हे’ निर्बंध राहणार कायम; अजित पवारांच्या सूचना
- LICची नवी योजना; एकावेळी प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवा 12 हजार रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

