🕒 1 min read
बीड : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
‘पिढ्यानपिढ्या ऊसाच्या बुडावर कोयत्याने घाव घालून अनेक हाल-अपेष्टा सोसलेल्या ऊसतोड कामगारांच्या हातांनी स्वतःची व आपल्या मुला-बाळांची उपेक्षा सहन करत आपली साखर गोड केली. आता या कष्टकरी हातांच्या ऋणातून उतराई होण्याची आपली बारी आहे, त्यासाठी कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची पारदर्शक पद्धतीने नोंदणी होणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याच्या भावना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी उसतोड मजुरांचे प्रश्न मार्गी लावण्याचे श्रेय धनंजय मुंडे यांना देण्याचा सपाटा सुरू केला आहे. सोशल मीडियावरून याबाबत प्रसिद्धी देण्यात येत आहे. यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य करत ऊसतोड मजुरांना नाव नोंदणीचे आवाहन केले आहे.
पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे त्या म्हणाल्या की, ‘ऊसतोड कामगार हा माझा कधीच राजकारणाचा विषय नव्हता. श्रेयासाठी कधी मी काम केले नाही’ असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. ‘लोकनेते मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगारांचे महामंडळ आपण सत्तेत असताना स्थापन झाले. ते काम आता पूर्णत्वास आले आहे. हे महामंडळ आता सामाजिक न्याय विभागाकडे आहे, ऊसतोड कामगारांनी जास्तीत जास्त नोंदणी करून विविध योजनांचा लाभ घ्यावा’, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तसेच ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सर्वांना जपायची आहे. श्वासात श्वास असेपर्यंत दसऱ्याला भगवान भक्तीगडावर नतमस्तक होण्यासाठी मी येणार आहे, तुम्हीही येणार ना? अशी साद पंकजा मुंडे यांनी घातली. ‘दरवर्षी दसरा मेळाव्याला देशभरातून एका रात्रीत लाखो लोक जमा होतात, मागील वर्षी कोरोनामुळे ऑनलाईन मेळावा घेतला. ही परपंरा अखंड ठेवण्यासाठी यंदा मी नतमस्तक होण्यासाठी येणार आहे’, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
