🕒 1 min read
मुंबई : संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. यामुळेच कोथिंबिरीसह सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले असून, पुण्यात किरकोळ बाजारात कोथिंबीर गड्डीचे दर ५० ते ८० रुपयांवर जाऊन पोहोचले. काही ठिकाणी कोथिंबीर २०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. किरकोळ भाजी बाजारांमध्ये कोथिंबीरची एकदम लहान जुडी २० रुपयाला तर मेथीची जुडी २५ ते ३० रुपये, पालकजुडी २० ते २५ रुपयांना मिळत आहे. तर तीन दिवसांपूर्वी नागपूर येथे कोथिंबीर प्रति किलो तब्बल ३२० ते ३५० रुपये दराने विक्री झाल्याची नोंद आहे.
जेवणातील प्रत्येक भाजीमधील महत्त्वाचा घटक असलेल्या कोथिंबीरच्या भावाने चांगलेच डोके वर काढले आहे. सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढलेले असताना कोथिंबीरच्या जुडीने अधिक भाव खाल्ला आहे. त्यामुळे आहारातून कोथिंबीरची चव गायब झाली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्समध्येही कोथिंबीरचा वापर टाळला जात आहे. परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेकडो हेक्टर शेत जमिनीवरील पिकांची नासाडी झाली आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडलेले आहे. त्यामुळे दिवाळीचा सण तोंडावर असताना भाजीपाल्याचेच दर वाढते असल्याने महिलावर्गाची चिंता वाढली आहे.
मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने व पाणी शेतात तुंबून राहिल्याने कोबी-फ्लॉवरची पिके उद्धवस्त झाली. वेलवर्गीय भाज्यांची फुलगळ झाल्याने उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले असल्याचे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. ही स्थिती असताना मात्र अन्य राज्यातूनही कोथिंबीरची मागणी सध्या कायम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अवकाळी पावसाचा मोठा परिणाम शेतीमालावर झाला असून, सर्वाधिक फटका पालेभाज्यांना बसला आहे. यामुळेच सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. याचा परिणाम दरावर झाला असून, पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अखेर नगर दौऱ्याचा मुहूर्त सापडला
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
- ‘त्या’ व्यक्तीला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?; ‘ते’ फोटो व्हायरल करणाऱ्यांवर अजितदादा चिडले
- ‘देशवासियांनी मेड इन इंडिया वस्तूच खरेदी कराव्यात’, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोदींचे आवाहन
- ‘जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोवर शस्त्रे खाली ठेवू नका’, पंतप्रधान मोदींचे आवाहन


