औरंगाबाद : शहरात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज दिड हजारांच्या घरात कोरोना रुग्ण येत होते. त्याचवेळी राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १४ एप्रिलला संचारबंदी लागू केली. त्यामुळे गेल्या दिड महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे एसटीची चाके थांबली आहेत. या दिड महिन्यात औरंगाबाद एसटी विभागास तब्बल २२ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन संपण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना आता प्रवासी वर्गाचे लक्ष एसटीकडे लागलेले आहे. स्थानिक प्रशासनाच्या आज होणाऱ्या बैठकीत एसटी सुरू करण्याविषयी निर्णय होणार असल्याची माहिती एसटीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गतवर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आर्थिक फेऱ्यामधून एसटी बाहेर पडत नाही तोच पुन्हा एकदा कडक निर्बंधांच्या आर्थिक चिखलात एसटीचे चाक अडकले आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी प्रशासनावर मोठा परिणाम झाला होता. हजारो कोटींचा भुर्दंड एसटीला सहन करावा लागला होता. पाच महिन्यांच्या खडतर लॉकडाऊननंतर २० ऑगस्ट २०२० पासून एसटीची चाके रुळावर येण्यास सुरुवात झाली होती.
मात्र सुरुवातीच्या काही दिवसात कोरोनाच्या भितीने प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र मार्च महिन्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली. शनिवार रविवार कडक लॉकडाऊन, अंशतः लॉकडाऊन, ब्रेक द चेन चे कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर १४ एप्रिल पासून ते आजपर्यंत एसटीची चाके थांबलेली आहेत. दररोज ५० लाखांचे उत्पन्न मिळवणाऱ्या एसटीला या काळात तब्बल २२ कोटींचे नुकसान झाले आहे.
प्रवाशांचे लक्ष प्रशासनाच्या निर्णयाकडे: जिल्ह्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनानेही निर्णय झाल्यास एसटी सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या अंतर्गत एसटींची साफसफाई सुरु करण्यात आली आहे. ग्रीन सिग्नल मिळताच एसटी सुरु केली जाईल. त्यामुळे प्रवासी वर्गाचे संपूर्ण लक्ष प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील पहिल्या ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर’चे अजित पवारांच्या हस्ते उदघाटन
- अनलॉकला सुरुवात : ‘या’ जिल्ह्यात सलून, कपड्याचे दुकान, सराफ दुकानं उद्यापासून सुरू होणार !
- ‘बालकांना कोरोनाच्या लाटेपासून वाचविण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करावेत’
- पुढील आठवड्यापासून औरंगाबाद मनपा करणार बेघर, भिकाऱ्यांचे लसीकरण
- ‘त्या’ ३० नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या केली!, गिरीश महाजनांनी मौन सोडले


