पुणे : कोरोना महामारीच्या प्रभावामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. सुरुवातीला युजीसी आणि राज्य सरकारमधील परीक्षा घेण्यावरून झालेल्या संभ्रमानंतर अखेर अंतिम वर्ष परीक्षा या महिन्यात पार पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आधीच परीक्षा घेण्यास झालेला विलंब व भविष्यातील अनिश्चिततेमुळं विद्यार्थी तणावात असतानाच विद्यापीठाच्या हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. त्या ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पार पडणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी सोयीस्कर पर्यायाची निवड केली. अनेक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यावी लागली. तीन -चार तास थांबुन देखील परीक्षा वेळेत होत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ऑनलाईन परीक्षांचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आला आहे. जर कोट्यवधी खर्चूनही विद्यार्थ्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागत असेल तर याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उभा राहत आहे. तर, नेहमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे यंदा देखील अनेक प्रश्नांमध्ये त्रुटी आढळत आहेत. आकृत्यांवर आधारित प्रश्नांच्या आकृत्याच गायब आहेत, काही ठिकाणी प्रश्नच नाही फक्त पर्याय आहेत, अशा अनेक घटना समोर येत आहेत.
जर, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातच हा प्रकार असेल तर उर्वरित महाराष्ट्राची कल्पना न केलेलीच बरी! विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षी या गंभीर अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने एकदाच्या कशाबशा या परीक्षा संपाव्यात असंच वाटत आहे. दुसरीकडं, जे विद्यार्थी या गलथान कारभाराविरुद्ध जाब विचारत आहेत, त्यांना या परीक्षा पुन्हा घेतल्या जातील असं उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळं आधीच वेळ वाया गेला असताना आता पुन्हा परीक्षा कधी? त्या देखील नीट असतील याची काय खात्री? पुरेसा वेळ मिळून देखील एवढं मोठं विद्यापीठ प्रशासन जबाबदारी सांभाळण्यास अपयशी का ठरत आहे? असे प्रश्न आता निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
- कारशेड हलवणं हा ‘बालहट्ट’ असेल, तर ‘Axis बँके’त सरकारी खाती वळवण्याचा कोणता हट्ट म्हणायचा?
- आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीने दिला स्वबळाचा नारा!
- मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा राज्यपालांना अधिकार : प्रकाश आंबेडकर
- राज्यपाल-मुख्यमंत्री वादात कंगणाची उडी
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा


