औरंगाबाद : शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर केलेल्या किसान आंदोलनानंतर अखेर केंद्रातील मोदी सरकार झुकले आहे. शेतकरी विरोधी व वादग्रस्त तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, पण हे कायदे आधीच मागे घेतले असते, तर या आंदोलना दरम्यान ज्या साडेचारशे शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले ते वाचले असते, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांनी मोदींवर (Narendra modi) केली.
शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असलेले अखेर ते तीन कृषी कायदे केंद्र सरकारने परत घेतले. त्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेनेदेखील या कृषी कायद्यांना कडाडून विरोध करत केंद्राच्या विरोधात आंदोलन केले होते. दिल्लीच्या सीमेवर जाऊन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शेतकरी नेत्यांची भेट घेऊन या लढ्यात शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली होती. आता वर्षभरानंतर होईना केंद्र सरकारने हे तीनही कृषी कायदे परत घेतले.
या निर्णयावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांनी मोदींना धन्यवाद दिले आहेत. मात्र आंदोलनादरम्यान ज्या चारशेहून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. ते रोखता आले असते. असा टोला देखील मोदी सरकारला लगावला आहे. खैरे म्हणाले, शेतकरी विरोधी कृषी कायदे कुणालाच मान्य नव्हते. शेतकऱ्यांनी पहिल्यापासूनच या कायद्याच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले. देशातील हे पहिले असे आंदोलन होते जे वर्षभरापासून सुरू आहे. अखेर शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे मोदींना झुकावे लागले. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली असली तरी शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.
हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेण्याची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा राज्यातील निवडणुकांमध्ये फटका बसेल या भितीने केंद्र सरकारने हे कृषी कायदे मागे घेतल्याचे दिसून येते. पण याचा त्यांना निवडणुकीत फारसा फायदा होणार नाही. असा अंदाज खैरे यांनी वर्तवला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला सरकारने किमान आधारभूत किंमत द्यावी. जेणेकरून त्यांना मोठ्या कष्टाने पिकवलेले धान्य, भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागणार नाही. असा चिमटा देखील खैरे यांनी काढला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना डासांप्रमाणे चप्पलेखाली चिरडलं अन्…’
- गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू; भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य
- महादेव जानकरांचा भाजपाला घरचा आहेर; म्हणाले,’आमचं सरकार असतानाही…’
- विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीवर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप; म्हणाले…
- ‘विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा’, यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांना टोला


