मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्यावरून सोमवार सकाळपासून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करुन बिहार पोलीस फक्त कर्तव्य बजावत आहेत. यात कोणताही राजकीय हेतु नाही”, अशा शब्दात त्यांनी आपले मत मांडले. त्याचसोबत भाजपा नेते राम कदम यांनीदेखील या प्रकरणी संबंधित तपास यंत्रणेवर टीका केली. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.
आता याच मुद्द्यावरून अमृता यांना अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी खडे बोल सुनावले आहेत. ‘सुशांतच्या दु:खद मृत्यूचं राजकारण करू नका आणि मुंबईची निंदा करण्यासाठी या प्रकरणाचा वापर करू नका,’ असा सल्ला रेणुका शहाणे यांनी दिला आहे.
‘अमृता या मिसेस मुख्यमंत्री असत्या तर मुंबईबद्दल त्यांनी कोणत्याही परिस्थितीत असं वक्तव्य केलं नसतं. एल्फिन्स्टन पूल फडणवीसांच्याच काळात कोसळला होता. त्यात अनेक मुंबईकरांचे जीव गेले. तेव्हा मुंबई असुरक्षित किंवा संवेदनाहीन असल्याचं अमृता कधी म्हणाल्या नव्हत्या,’ याची आठवणही त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

