मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे विविध पुरावे सादर केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी फोन टॅपिंग करून फडणवीसांना मदत केल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींवेळी शिरोळचे अपक्ष आमदार व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना भाजप सोबतच राहण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी धमकावल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दरम्यान, आव्हाडांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली असून राजेंद्र यड्रावकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या विषयावर भाष्य केलं आहे. ‘रश्मी शुक्ला यांच्याशी माझा थेट संपर्क नव्हता. मात्र, त्यांच्याशी निगडित व्यक्तीद्वारे मला भाजपमध्ये येण्याबाबत ऑफर देण्यात आली होती. या व्यक्तीनेच माझं त्यांच्याशी बोलणं करून दिलं होतं. मी अपक्ष आमदार असल्याने काही कार्यकर्ते व मतदार संघातील नागरिकांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नाही असं कळवलं.’
पुढे ते म्हणाले, ‘मतदारसंघातील बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीलाच पाठींबा देण्यावर एकमत झाले. त्यानुसार मी महविकास आघाडीलाच पाठींबा दिला. भाजपच्या ऑफरबाबत मी उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांना देखील कल्पना दिली होती. भाजपमध्ये येण्याची ऑफर मला येतच होती,’ असा खुलासा यड्रावकर यांनी केला आहे. दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी दबाव आणल्याचा कोणताही उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत केलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘युपीएच्या कॅप्टन बदलावर १६ वा गडी बोलतोय, त्याला काही अर्थ नाही’
- मला बॅटिंग करायला मजा येते आणि बॉलिंगही थेट स्टम्प्सवर करतो; फडणवीसांची फटकेबाजी
- मोठी बातमी : सचिन वाझेंचा एनआयए कोठडीतील मुक्काम वाढला !
- अध्यक्षपदाबाबत बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, सेनेनं आधी यूपीएचा भाग व्हावं – सावंत
- आता राज्यव्यापी लॉकडाऊन करता येणार नाही, मात्र…केंद्र सरकारची नवी नियमावली


