टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार सभांवेळी आवेशपूर्ण भाषण करण्याच्या नादात अनेक नेत्यांंकडून आचार संहितेचा भंग केला जात आहे. या लोकसभा निवडणुकीत आचार संहितेच्या भंगाच प्रमाण वाढले असून निवडणूक आयोगाला वारंवार वाचाळ नेत्यांवर कारवाई करावी लागत असून बिनबुडाच्या आरोपांना क्लीन चिट द्यावी लागत आहे. आता भाजप अध्यक्ष अमित शहा यांना खून प्रकरणातले आरोपी म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना निवडणूक आयोगानं क्लीन चिट दिली आहे.
मध्य प्रदेशातल्या जबलपूरमधील एका भाषणात राहुल गांधी यांनी अमित शाह हे खून प्रकरणातले आरोपी आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विधानाला भाजपाकडून आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. राहुल गांधींच्या भाषणाचा तपशील निवडणूक आयोगानं जबलपूरच्या डीईओंकडून मागवण्यात आला. या भाषणाची आयोगानं पडताळणी केली. मात्र त्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचं आढळून आलं नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग न झाल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं.


