मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वादग्रस्त कृतीने व वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील टीका असो व महाविकास आघाडी सरकारवर वारंवार केलेले आरोप, त्यांच्या विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं अनेकदा समोर आलं आहे.
आता, श्री क्षेत्र औंढा नागनाथ ,जि. हिंगोली येथील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अहिल्यादेवींच्या या पुतळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजित होते. मात्र, कोरोनामुळे ते शक्य झालं नाही.
‘गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना पुतळा अनावरणाला वेळ मिळत नसल्यानं आजही अहिल्यादेवींचा पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून दुर्लक्षितपणे उभा आहे. ते बहुधा माझं कुटुंब माझी जबाबदारी यात व्यस्त आहेत,’ असा टोला गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच, ‘१६ मार्चला महापराक्रमी मल्हाररावजी होळकर यांची जयंती आहे. या दिवसांचं औचित्य साधून मेंढपाळ बांधव आणि भगिनींच्या हस्ते दुपारी १ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल. मी येतोय, तुम्ही पण या’ अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.
पडळकरांच्या टीकेचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी समाचार घेतला आहे. ‘पडळकरांचं वर्तन मी पाहतोय. त्यांनी जबाबदारीने वागलं, बोललं पाहिजे. ज्या भाषेचा ते वापर करतात ती महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नाही. भाजप किती बेजबाबदार आहे ते या वक्तव्यातून स्पष्ट होतंय. कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत असताना एकत्र येण्याचं आवाहन करणे चुकीचं आहे.’ अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्यात कोरोनाचा विस्फोट ! आज तब्बल ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- वेळ आली तर मोदी ताज महाल पण विकतील : ममता बॅनर्जी
- परिवर्तन बंगालमध्ये नाही तर दिल्लीत होणार; ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांवर पलटवार
- ‘या’ कारणामुळे राज ठाकरे मास्क वापरत नसतील; रामदास आठवलेंचा खुलासा


