मुंबई : राज्यात कोरोना रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून आरोग्य यंत्रणा देखील अपुऱ्या पडत आहेत. दरम्यान, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच, शनिवार-रविवार या दोन दिवशी वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांनी देखील या कडक निर्बंधांना विरोध केला आहे. अशातच, पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 10 लाख पर्यंत जाऊ शकते अशी शक्यता काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, ‘आता वाढणाऱ्या करोना रुग्णांची संख्या सध्या ज्या गतीनं वाढत आहे ते पाहता वीकेण्ड लॉकडाऊन पुरेसा नाही,’ असं देखील वडेट्टीवार म्हणले.
‘आम्ही कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्स कमी पडतील. हे सगळे आणणार कुठून? त्यामुळं किमान तीन आठवड्यांचा पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल. आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांना ही विनंती करणार आहे,’ असं भाष्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं.
दरम्यान, MPSC परीक्षांबाबत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली यावेळी संपूर्ण लॉकडाऊनचा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. ‘MPSC च्या परीक्षांच्या चर्चेत अचानक लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली. मात्र पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व अन्य पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याशिवाय घेतला जाऊ शकत नाही. यासोबतच, लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सोसणाऱ्या, हातावर पोट असलेली गोरगरीब जनता, व्यापारी, छोटे व्यवसायिक यांच्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेतल्यासच लॉकडाउनच निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल,’ अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्यात शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु काय बंद ?
- लसीकरणाचा उत्सव करायला महाराष्ट्रात लसीच नाहीत, पंतप्रधानांची व्यवस्था चुकतेय – अस्लम शेख
- आता कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल; नारायण राणेंच भाकीत
- आता दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय ? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती
- ‘उद्धव ठाकरेंची शपथ घेऊन सांगणार का लसींचा किती पुरवठा झाला ? आहे का हिंमत ?’


