🕒 1 min read
मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या पाच आणि सहा जुलैला होत आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. हे पद रिक्त असल्याने भाजपने थेट राज्यपालांकडे धाव घेऊन, तातडीने अध्यक्षांची निवड कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून ही निवड याच अधिवेशनात होणार असल्याची माहिती दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल आणि याच अधिवेशनात निवड होईल अशी माहिती दिली. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या वाट्याला असलेलं विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात स्पर्धा आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध असल्याचं वृत्त समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांपैकी कुणीही याबाबत जाहीरपणे वाच्यता केली नसली तरीही याबाबत कुजबुज मात्र सुरु आहे.
चव्हाण हे स्पष्टवक्ते, अभ्यासू, प्रामाणिक आणि सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध असण्याच्या प्रमुख कारणांचा विचार केल्यास राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना विरोधीपक्षापेक्षा जास्त त्रास हा राष्ट्रवादीला झाला होता. राष्ट्रवादीच्या अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यानंतर त्यांच्या अडचणीत झालेली वाढ ही चव्हाण यांच्याच कार्यकाळात झाली होती.
पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. राज्य बँकेवरील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला त्यांनी जोरदार धक्का दिला. त्यानंतर सिंचन क्षेत्रावर श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करुन, त्यांनी राष्ट्रवादीकडील जलसंपदा खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे जर चव्हाण यांचे नाव पुढे आलेच असेल तर राष्ट्रवादीकडून विरोध होणे स्वाभाविक आहे.
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार, मात्र हा तिढा कसा सुटणार ?
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
- ‘शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या पडळकरांकडे ५० लाखांची गाडी कशी?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

